पुणे : उद्योगांचे अधिकाधिक विकेंद्रीकरण केले तर त्याचा फायदा समाजातील तळागाळामध्ये आणि विशेषता ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकेल. एकेकाळी मुंबई (Mumbai) औद्योगिक राजधानी होती परंतु उद्योगांचे प्रमाण कमी होत असताना या ठिकाणी आर्थिक राजधानी कशी निर्माण होईल, यासाठी मी राज्याचा प्रमुख असताना प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली, असे विधान ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
भारतामधील 80 टक्के लोक मांसाहारी, हे जेवणही चविष्ट असते; राहुल गांधींचा सरकारला टोला
उद्योग क्षेत्रा संदर्भात निर्णय घेताना राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे असते. पायाभूत सुविधा सक्षम झाल्या पाहिजे तरच महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाणार नाही आणि त्यामधून निर्माण होणारे रोजगार मराठी तरुणांच्या हातातून जाणार नाही, असे ते म्हणाले. मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय एक्स्पो 2027 प्रदर्शनचे ब्रोशरचे प्रकाशन (Maratha Entrepreneurs Association’s International Expo 2027) शरद पवार यांच्या हस्ते झाले. आमदार रोहित पवार,असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, माजी अध्यक्ष अंकुश आसबे, अरुण निमन, सई पाटील, सायली काळे, खजिनदार राजेश कुराडे आदी यावेळी उपस्थित होते.
पारंपारिक शेती प्रत्येकाला नोकरी देण्यास सक्षम नाही-शरद पवार
देश स्वतंत्र झाला त्यावेळी 35 कोटी लोकसंख्या होती, आज लोकसंख्या वाढली मात्र जमीन तेवढीच आहे. शेतीला जमीन अपुरी पडत आहे. पारंपारिक शेती ही प्रत्येकाला नोकरी देण्यास सक्षम नाही , त्यामुळे पारंपारिक शेती करण्यापेक्षा विविध व्यवसाय आणि उद्योगांवर महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तरच महाराष्ट्र पुढील काळामध्ये वेगवान गतीने प्रगती करू शकेल असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
डेटा सेंटर म्हणजे गुंतवणूक नव्हे-रोहित पवार
अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकणमधील उद्योजक महाराष्ट्र बाहेर चालले आहे. हिंजवडी मधील वाहतुकीची कोंडी कायम आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी पायाभूत सुविधांवर लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायिक दृष्ट्या सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्र मध्ये मिळते ,अशावेळी उद्योगांना आकर्षित करणे अवघड आहे . डेटा सेंटर म्हणजे गुंतवणूक नव्हे दोन हजार कोटींच्या डेटा सेंटरमध्ये केवळ 200 लोकांना रोजगार देण्याची क्षमता असते. महाराष्ट्र मध्ये परकीय गुंतवणूक आली तरी त्याचा फायदा महाराष्ट्रामधील उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुण रोजगारक्षम आणि उद्योगक्षम होऊ शकेल, असे मत रोहित पवार यांनी मांडले.
मराठा समाज उद्योग, व्यवसायामध्ये दोन टक्केच-गायकवाड
महाराष्ट्राध्ये 35 टक्के इतके मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज उद्योग व्यवसायामध्ये मात्र केवळ एक ते दोन टक्के आहे . ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशन कार्यरत आहे . मराठी तरुणांमध्ये नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी मानसिकता कशी तयार करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत यासाठी 14 ते 17 वयोगटातील तरुणांना एक लाख रुपयांची औद्योगिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यामधून तरुण उद्योजक घडण्यास निश्चित मदत होईल, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केलंय.
असोसिएशनच्या अहिल्यानगर चाप्टरचे यावेळी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असोसिएशनच्या बिझनेस एक्सपो यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गणेश सातपुते ,रवी घाटे ,दिपाली चव्हाण, मोनिका बढाया, निलेश चव्हाण, विनोद जाधव ,जगदीश कदम, विलास यादव, सागर यादव ,राजू भिसे ,महेश भागवत ,सचिन खाटपे, चंद्रकांत गायकवाड, सुहास आदमाने, अंकुश आजबे तेजराज पाटील, विक्रम गायकवाड ,रोहन बिल्डर्स, मोहर ग्रुप डिजिटल डॅम, जवाहर चोरगे, सतीश कोकाटे, मधुकर चोरगे, योगेश पासलकर, अजयसिंह देसाई ,पू. ना. गाडगीळ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
