Monalisa Bagal’s strong comeback! ‘Kalam Ka Badshah’, a new Marathi movie, will soon hit the screens : संविधानाची ताकद, अन्यायाविरोधातील लढा आणि एक धगधगती कहाणी, व्हि.एम.भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित ‘कलम का बादशाह’ नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री मोनालिसा बागलने सशक्त कमबॅक केलं आहे. कायद्याची धार, संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील जिद्द या सगळ्यांचा थरारक संगम म्हणजे व्हि.एम.भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट ‘कलम का बादशाह’. सत्तेला प्रश्न विचारणारी आणि सामान्य माणसाच्या हक्कांचा आवाज बनणारी ही कथा लवकरच प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
ओटीटी गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा टेलिव्हिजनवर! आगामी मालिकेत ‘ही’ भूमिका साकारणार
‘कलम का बादशाह’ हा सिनेमा दीक्षा आणि जय या दोन तरुणांच्या संघर्षमय प्रवासाची सशक्त मांडणी करतो. अन्याय, भीती आणि सत्तेच्या दबावासमोर न झुकता ते संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा आधार घेत लढा उभारतात. कायदा हेच त्यांचं शस्त्र ठरतं आणि धैर्य ही त्यांची खरी ताकद. या प्रवासात ते फक्त शत्रूशीच नव्हे, तर समाजातील व्यवस्थात्मक त्रुटींशीही भिडतात, ज्यामुळे हा सिनेमा केवळ थरारक न राहता विचारप्रवर्तक ठरतो.
या चित्रपटात मोनालिसा बागल, यश डिंबळे, आनंद शिंदे आणि जय मोर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२३ मध्ये आलेला सिनेमा ‘रावरंभा’ नंतर काही काळ पडद्यापासून दूर राहिलेली अभिनेत्री मोनालिसा बागल ‘कलम का बादशाह’ या चित्रपटातून सुमारे दोन ते तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनयातली प्रामाणिकता, नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण ही मोनालिसाची ओळख आहे. सामाजिक आशय असलेल्या आणि वास्तवाशी भिडणाऱ्या भूमिका साकारण्यात ती सातत्याने लक्षवेधी ठरली आहे आणि आता पुन्हा एकदा या सिनेमातून तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. विशेष म्हणजे ‘कलम का बादशाह’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन आनंदकुमार सरवदे यांनी केले असून, निर्माते व्ही. एम. भैलुमे हे आहेत. आर. बी. फिल्म्स प्रॉडक्शन यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सिनेमाचे छायाचित्रण मनीष वि. सोनी यांनी सांभाळले असून, पटकथा व संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत.
सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू
शक्तिशाली विषय, प्रभावी अभिनय आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित आशय यामुळे ‘कलम का बादशाह’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि थरारक अनुभव ठरणार आहे.मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारायला भाग पाडणारा आणि संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणारा सिनेमा ‘कलम का बादशाह’ लवकरच आपल्या जवळच्या सिनेमागृहात.
