India Pakistan Crisis : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध प्रचंड ताणले (India Pakistan Crisis) गेले आहेत. अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले. घाबरलेल्या पाकिस्तानकडूनही काही निर्णय घेतले गेले आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. पाकिस्तान सरकारने (Pakistan News) बजेटमध्ये संरक्षणावरील खर्चात 18 टक्क्यांनी वाढ करत हा खर्च 2.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त करण्यास मंजुरी दिली आहे. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या एक महिना आधी म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात बजेट सादर करण्यात येणार आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारीच्या नेतृत्वात एक प्रतिनिधीमंडळ सोमवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भेटले. पंतप्रधानांच्या आर्थिक टीमशीही चर्चा केली. या दरम्यान बजेटशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सरकारने पीपीपीला जवळपास 17.5 ट्रिलियन रुपयांचे नवीन बजेट सादर केले. यामध्ये संरक्षणातील खर्चात 18 टक्के वाढीचा प्रस्तावही समाविष्ट होता. पीपीपीने या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
कंगाल पाकिस्तानचे मंत्री मालामाल, पगारात घसघशीत वाढ; मिळणार ‘इतका’ पगार
चालू आर्थिक वर्षात पाकिस्तान सरकारने संरक्षणासाठी 2 हजार 122 अब्ज रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. 2023-24 मधील 1804 अब्ज रुपयांच्या तुलनेत 14.98 टक्के जास्त आहे. पाकिस्तानच्या एकूण वार्षिक खर्चात कर्जानंतर संरक्षण खर्चाचा दुसरा क्रमांक आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान सरकारला कर्जाचे हप्ते देण्यासाठी 9 हजार 700 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. वाढलेला तणाव पाहता पाकिस्तानने सीमेजवळ नवीन डेपो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण दारूगोळच नाही तर अशा डेपोंचे कोणतेही रणनितिक महत्व नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील हत्यारे दुसऱ्या देशांना दिली आणि आता स्वतः कंगाल झाला आहे. आर्थिक फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता पण या निर्णयामुळे पाकिस्तानचे दीर्घकालीन रणनितिक नुकसान झाले आहे.
मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका