Download App

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; विदर्भ अन् मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Weather in Marathwada : अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत आहे. बहुतांश भागात शेतीच्या पूर्व मशागतीला अडसर निर्माण झाला आहे.  (Weather)अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी (ता.२४) सर्वत्र पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यभर पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सतर्कतेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपुर आणि नागपुर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम; विभागातल्या २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी

यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजासह वादळी पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

त्याचबरोबर, पुढील चार दिवस राज्यात पावसाची हजेरी विविध भागात शक्य असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम करून मॉन्सूनने शनिवारी गोव्याच्या उंबरठ्यावर मजल मारली आहे. मॉन्सून पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

follow us