मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. मात्र या यादीतून शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Ajit Pawar group has dropped the name of Sharad Pawar’s group mla Ashok Pawar while filing a disqualification petition in the legislature)
अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील तीन आमदारांची नाव मात्र वगळली आहेत. ज्यामध्ये आमदार अशोक पवार, नवाब मलिक आणि चेतन तुपे यांचा समावेश आहे. नवाब मलिक आणि चेतन तुपे यांनी अद्यापपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण त्याचवेळी अशोक पवार यांनी सुरुवातीपासून आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर देखील अशोक पवार यांचे नाव वगळल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अजितदादा आणि अशोक पवार या दोघांचे संबंध एकदम जवळचे आहेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील अशी अटकळ पहिल्यापासून होती. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार राजभवनात उपस्थित होते. पण प्रत्यक्षात त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तीनच दिवसात त्यांनी भूमिका बदलत शपथविधीवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बोलावलं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी खोटं बोलून आमच्याकडून सह्या घेतल्या, असा खुलासा त्यांनी केला होता.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनिल शेळके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते हे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर चेतन तुपे यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण आमदार पवार हे शरद पवारांसोबत कायम राहिले आहेत. इतकंच नाही तर अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. या कारखान्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच पुण्यात बैठक घेतली होती. त्यामुळे ते पुन्हा अजित पवार यांच्यासोबत जातील असे वाटले होते. मात्र ते अद्यापही शरद पवार यांच्याच सोबत कायम राहिले.