Download App

समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

समीर भुजबळ त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. 

Chhagan Bhujbal on Sameer Bhujbal Candidacy : महायुतीत जागावाटपाने वेग घेतला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची एक-एक यादी जाहीर केली आहे. अजित पवार गटानेही ३८ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून पुन्हा तिकीट मिळालं आहे. परंतु, त्यांचे पुत्र समीर भुजबळ यांना संधी मिळालेली नाही. समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून इच्छुक आहेत. याच मतदारसंघात ते आता अपक्ष उमेदवारी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया दिली आहे. समीर भुजबळ त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

येवल्यातून मीच लढणार! छगन भुजबळांनीच केलं कन्फर्म; कारणही सांगितलं

छगन भुजबळ म्हणाले, समीर भुजबळ अपक्ष लढणार असल्याची फक्त चर्चा आहे. कुणी म्हणतं मशालीवर लढणार तर कुणी म्हणतं तुतारीवर लढणार. पण अजून तरी समीर भुजबळ कुठेच गेलेले नाहीत. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मीडियाला त्यांनी काही सांगितलं असेल तर त्याची मला माहिती नाही. पण ते त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत.

दरम्यान, नांदगाव मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता समीर भुजबळ यांच्यासमोर अपक्ष लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. समीर भुजबळ मशालीवर लढतील अशी शक्यता होती. परंतु, बुधवारी ही शक्यता देखील मावळली. त्यामुळे आता त्यांना अपक्ष लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. अशा परिस्थितीत समीर भुजबळ आता स्वतः अपक्ष लढणार की येथील एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

असा आहे नांदगाव मतदारसंघाचा इतिहास

नांदगाव मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पण १९९० मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी मतदारसंघात लाल निशाण फडकवले. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना लाटेत नांदगावकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले. राजेंद्र देशमुख या मतदारसंघातील शिवसेनेचे पहिले आमदार झाले. १९९९ मध्ये काँग्रेसच्या अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. २००४ मध्ये संजय पवार यांनी पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला. इथेपर्यंत काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना होता. २००९ मध्ये मात्र राजकीय बदलाचे वारे जोरदार वाहू लागले होते. भुजबळ यांनी आघाडीच्या जागा वाटपात नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला आणि तिथून पंकज भुजबळ यांना रिंगणात उतरवले.

 

follow us