Download App

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट, भाजप अन् काँग्रेस एकत्र; कसा घडला चमत्कार?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.

Solapur Politics : राज्यात अन् देशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात विळा भोपळ्याचं नातं असलं तरी स्थानिक निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घातले जात आहेत. याच मोठं उदाहरण सोलापुरात पाहण्यास मिळालं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आपण या निवडणुकीसाठी पुढाकार घेतला असा दावा आमदार कल्याणशेट्टी यांनी केला. आता याबाबतीत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

सोलापूरच्या वेताळ शेळकेने उभारली ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी ! मुंबईच्या पृथ्वीराजला सहज नमविले

काँग्रेस-भाजप दुसऱ्यांदा एकत्र

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा मिळाला. भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आवाहन केले होते. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळीही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी पाठिंबा दिला होता तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नाही. दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत, त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे. पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

शरद पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर ते पंतप्रधान असते; सुशीलकुमार शिंदेंनी मनातली सल बोलून दाखविली !

मुख्यमंत्र्यांनी सचिन कल्याणशेट्टी यांना काही सूचना केल्या होत्या. त्यांनी आम्हाला आवाहन केलं ते आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केला आहे. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभू आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दिली.

follow us