Download App

हिंदुंना भगवा दहशतवादी, आतंकवादी म्हणणारे हेच; शिंदेंच्या पत्रावर सातपुतेंचं जोरदार प्रत्युत्तर

Ram Satpute On Praniti Shinde : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचे स्वागत करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात राम सातपुते जी, मी सोलापूरची लेक म्हणून आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत करत असल्याची उपरोधिक टीका केली होती. त्यावरुन आता राम सातपुतेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

“इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी स्वागत करते” : प्रणितींनी सेट केला प्रचाराचा अजेंडा

काय म्हणाले राम सातपुते?
मी ताईंना धन्यवाद देतो त्यांनाही शुभेच्छा देतो. सोलापुरातला माळशिरस तालुक्यातला मी आमदार आहे
ही निवडणूक भाजप जिंकणार या भीतीने केविलवाणे प्रयत्न काँग्रेसकडून होत आहेत पण सोलापूरकर अशा गोष्टींना भीक घालणार नाहीत. सोलापूरकर विसरलेले नाहीत, काँग्रेसचे हेच नेते हिंदुंना भगवा दहशतवादी भगवा आतंकवादी म्हणले. त्यामुळे सोलापूरकर या सर्व गोष्टींचा हिशोब घेणार आहेत. मागील 10 वर्षांत मोदी सरकारने जी विकासाची गंगा आणली त्यावर मला विश्वास आहे की सोलापूरकर भाजपला विजयी करतील. तेव्हाही ताई असंच मन मोठं करुन माझं अभिनंदन करतील हा विश्वास असल्याचं प्रत्युत्तर राम सातपुतेंनी दिलं आहे.

प्रणिती शिंदेंनी पत्रात काय म्हटलं?
“मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्या बद्दल शुभेच्छा देते.

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील 40 दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते ..सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते”

follow us