Maharashtra News : राज्यात आता सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. या काळात फुलांना मोठी मागणी असते. सजावट तयार करण्यासाठी या फुलांचाच वापर केला जातो. परंतु, या फुलांची जागा प्लास्टिकच्या फुलांनी घेतली आहे. अनेक ठिकाणी आता प्लास्टिकच्या फुलांचीच सजावट दिसते. यातून प्लास्टिक उद्योगाला चालना मिळत असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या गोष्टी आता सरकारच्या लक्षात आल्या आहेत. कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वात दादर फुल मार्केटमध्ये प्लास्टिक फुलांची होळी करण्यात आली. यावेळी रोहित पवार म्हणाले, प्लास्टिकच्या फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मी प्लास्टिकच्या फुलांच्या बंदीसाठी विधानसभेत स्वाक्षरी मोहीम घेतली होती. ज्यात 105 आमदारांनी सह्या केल्या. त्यांच्या सह्यांचं पत्र फुल उत्पादन मंत्र्यांना आणि पर्यावरण मंत्र्यांना दिलं. आज चार वाजता बैठक आहे. आता सिंथेटिक फुलं येत आहेत. येत्या काळात शेतकऱ्यांना खूप वाईट दिवस येतील. चीनमधून देखील माल येतोय पर्यावरण तसेच आरोग्यावर याचा परिणाम होतो त्यात वापरलेले रंग देखील आरोग्याला घातक आहेत असे रोहित पाटील यावेळी म्हणाले.
आमदाराचा मार, मंत्र्याची नोटांची बॅग; एकनाथ शिंदेंचा संताप, दोन्ही संजयला सुनावले खडेबोल
रोहित पाटील यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीला 105 आमदारांनी सह्या करून पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच नागरिकांच्या आरोग्यावर या प्लास्टिकचा विपरीत परिणाम होणार आहे ही गोष्ट आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले.