आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे (Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते विधान परिषदेचे उपसभापती झाले. महत्वाचं म्हणजे, अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे.
मी पक्ष सोडताना आदित्य ठाकरे यांना एसएमएस केला होता, कारण निर्णय एक दिवस आधी झाल्यामुळं त्यांना स्पष्टीकरण दिलं नाही. मी राष्ट्रवादीतून आल्यानंतर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो त्यावेळी त्यांना विरोध करायचा की साथ द्यायची असा प्रश्न होता. त्यावेळी मी साथ देण्याचा निर्णय घेतला होता असंही ते म्हणाले.
Shubhangi Patil : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिरनंतर बडा नेता सोडणार पक्षाची साथ
आदित्य ठाकरे यांना वरळीतून दोनदा निवडून आणण्यासाठी मी आणि इतर लोकांनी काम केलं. महानगरपालिकेमध्येही आम्ही सर्व नगरसेवकांना जी काही ताकद देता येईल ती ताकद देण्याचं काम केलं. यामागं हेतू असा होता की, एखादं नेतृत्व घडत असताना त्याला आपण शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे. दुसरी ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की, जेव्हा आपण साथ देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी राजकीय दृष्टीकोणातून झेप घ्यायची असेल तर त्यासाठी मर्यादा होत्या. मलाही ते लक्षात येत होतं असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी आणि माझ्यासोबत असलेल्या वर्गासाठी आणि समाजासाठी फक्त वरळीसाठी मर्यादित न राहता राज्यामध्ये आपण चांगली संघटना वाढवू शकतो, राज्यातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवू शकतो. ही संधी ज्यावेळी मला मिळाली, त्यावेळी मी संधीचं सोनं करण्याचं काम केलं. मी देखील 2014 साली मंत्री राहिलो होतो, त्यानंतर माझी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी होती, त्यावेळी मी सहकार्याची भूमिका घेतली असंही ते म्हणाले.
सचिन अहिर यांनी पुढे बोलताना म्हटलं की, आता कुणी सांगत असेल की वरळी आमचा बालेकिल्ला आहे, तर मी वरळीतून निवडून आलो होतो. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही आणि भविष्यकाळात ते वरळीकर ठरवतील. मी माझं राजकारण संकुचित वरळीपुरते मर्यादित न ठेवता, आता गल्लीमध्ये न राहता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गरजूंना न्याय देण्याचा मानस माझा राहणार आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे थेट आदित्य ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे.
