India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव (India Pakistan Tension) वाढतच चालला आहे. आज शुक्रवार सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या तणावातच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी (8 मे) घोषणा केली होती की देशातील 24 विमानतळ 10 मेपर्यंत बंद राहतील. परंतु, पाकिस्तानच्या हल्ल्यांत वाढ झाल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार विमानतळ 15 मेपर्यंत बंद राहणार आहेत.
जम्मूसह काही शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, उरीत गोळीबार, पठाणकोटात ड्रोनची घुसखोरी
केंद्र सरकारने ज्या 24 विमानतळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात चंडीगढ, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भूंटार, किशनगढ, पटियाला, शिमला, जैसलमेर, पठाणकोट, जम्मू, बिकानेर, लेह, पोरबंदरसह अन्य विमानतळांचा समावेश आहे. हे सर्व विमानतळ भारत पाकिस्तान सीमेजवळील शहरांत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानतळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत पाकिस्तानातील तणावाची परिस्थिती पाहता एअरलाइन कंपन्यांनी प्रवाशांसाठी ट्रॅव्हल एडवायजरी जारी केली आहे. सरकारने विमानतळांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती घ्या असे आवाहन यात करण्यात आले आहे. एअर इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की एविएशन अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार देशातील काही विमानतळे सध्या बंदच राहणार आहेत.
या दरम्यान जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, चंडीगढ, भूज, जामनगर आणि राजकोट येथून येणाऱ्या जाणाऱ्या फ्लाइट्स 15 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगो एअरलाइन कंपनीनेही 15 मेपर्यंत 24 विमानतळ बंद असल्याने विमानांची उड्डाणे रद्द करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. एविएशन कंपनी अकासा एअरने एडवायजरी जारी केली आहे.
जम्मूसह काही शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, उरीत गोळीबार, पठाणकोटात ड्रोनची घुसखोरी