Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका (Dhananjay Munde) प्रकरणात क्लिनचीट दिली. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी साहित्याची थेट खरेदीचा निर्णय योग्यच होता असा निर्वाळा न्यायालयाने दिला. यानंतर मुंडेंचं पुनर्वसन होणार, त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर विरोधकांकडून खोचक टीका केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी अजूनही त्यांना मिळालेला सरकारी बंगला अजूनही सोडलेला नाही अशी माहिती मिळाली आहे. या प्रकारावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खोचक टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी. त्यांना कुणीतरी आश्वासन दिलं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील असे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन साडेचार महिने उलटून गेले आहेत तरीदेखील त्यांनी अजून सरकारी निवासस्थान सोडलेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हाच मुद्दा उचलत सतेज पाटील यांनी खोटक वक्तव्य केले.
मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजितदादांचा तसाच सूर म्हणाले, “आम्ही मुंडेंना..”
धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. कृषी खात्याशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना क्लिनचीट दिली. त्यानंतर मुंडे पुन्हा मंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सध्या तरी काहीही स्पष्टता नाही. काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी सकारात्मक संकेत दिले होते.
धनंजय मुंडेंच्या बाबतीत तुम्ही पेपरमध्ये वाचलं. त्यांच्यावर कृषी विभागाच्या संदर्भात जे आरोप झाले त्यात न्यायालयाने काय सांगितलं कुठेही त्यांचा दोष नाही त्यांना क्लिनचीट दिली. परंतु, त्यांची जी काही बदनामी व्हायची ती झाली. यातून बाहेर पडताना त्यांना जो त्रास सहन करावा लागला. मनस्ताप झाला. त्यांच्या कुटुंबियांना जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही.
धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देण्याच्या संदर्भात अजून एका गोष्टीच्या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर त्या बद्दलचे सर्व वस्तुस्थिती पुढं येईल. यात अशाच पद्धतीने जर त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी उत्तर दिले होते.
‘मला कृषी खात्यासाठी आग्रह होता, पण.. छगन भुजबळांनी फोडला राजकीय बॉम्ब!