Download App

“सांगली शिवसेनाच लढणार” राऊत ठाम; काँग्रेस नेत्यांची दौऱ्याकडे पाठ; वादाची ठिणगी पडलीच

Sanjay Raut on Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या घडामोडींनंतरही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगलीवरील दावा कायम ठेवला. त्यानंतर आता संजय राऊत थेट सांगलीतच दाखल झाले आहेत. येथेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचे पुन्हा ठणकावून सांगितले.

Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!

दरम्यान, सांगली मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद आज राऊत यांच्या दौऱ्यातही उमटले. त्यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. दौऱ्याचे निमंत्रण मिळाले नाही म्हणून उपस्थित राहिलो नाही अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी दिली. तर काँग्रेसल रितसर आमंत्रण देण्यात येईल असे स्पष्टीकरण ठाकरे गटाकडून देण्यात आले.

संजय राऊत पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलो आहे. वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं. महाविकास आघाडीचे वातावरण हे झंजावात असावं त्या पद्धतीचं दिसत आहे. कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी फार आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. मी काँग्रेसच्या भावनांशी सहमत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते, तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते.

Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत

रामटेक हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे. आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा. पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला दिला. कोल्हापूर मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. आघाडीमध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते.

सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. सांगलीबाबतीत आम्ही काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे. पण लोकसभा निवडणूक सांगलीत शिवसेनाच लढणार. महाराष्ट्रात किमान 35 प्लस जागा निवडून आणण्याचं मिशन आहे त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना हातभार लावला पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.

follow us

वेब स्टोरीज