Dhairyasheel Mohite Patil : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच (Maharashtra Local Body Elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर शरद पवार आणि अजित पवार यांनीही मत व्यक्त केलं होतं. आता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनीही या मु्द्द्यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केलं आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे मला वाटत नाही असे खासदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी मत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचं म्हणाल तर मी माझं मत सांगतो. मी माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन वरिष्ठ नेत्यांना कळवील. जो कार्यकर्त्यांचा आदेश असेल तोच आम्ही साहेबांच्या कानावर घालू. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात साथ दिली त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय पवार साहेब, सुप्रियाताई किंवा जयंत पाटील काही निर्णय घेतील असे मला वाटत नाही.
पण तुमच्याच मतदारसंघातील आमदार अभिजीत पाटील यांचा संभाव्य विलीनीकरणाला पाठिंबा आहे असे विचारले असता त्यांना सगळ्यांबरोबर उठण्याबसण्याची सवय आहे. त्यांनी त्यांची वैयक्तिक मते मांडली असतील. तेही त्यांच्या मतदारांचं ऐकून घेतील. कारण मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं ऐकून घेतल्याशिवाय त्यांनी कधीच कोणता निर्णय केलेला नाही. त्यांच्या मनात जी भावना होती ती त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्याबद्दल म्हणाल तर मी ज्या जनतेच्या बळावर मी निवडून आलोय त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही.
विरोधी पक्षात असताना निधीची कमतरता जाणवते असा मुद्दा असतो. पण मला असं कधी जाणवलं नाही. निधी येण्याचा वेग थोडा कमी असू शकतो. पण विकासकामे आजपर्यंत तरी कुणी अडवलेली नाहीत असे उत्तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका प्रश्नावर दिले.