G20 Summit : देशाची राजधानी नवी दिल्लीत जी 20 शिखर परिषद (G20 Summit) मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली होती. रशिया-युक्रेनसंदर्भात (Russia Ukraine War) ठरावे होणे हे या परिषदेचे यश मानले जात आहे. परिषद यशस्वी झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर (Modi Government) कठोर शब्दांत हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला, आंदोलनाचा निर्णय उद्या होणार
पंतप्रधानांनी सर्व परदेशी पाहुण्यांनी रात्रीचे जेवण दिले. त्या डिनरसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) सोडून सगळ्यांना बोलावले. एक प्रकारे ते भव्य अशा गावजेवणाचेच निमंत्रण होते. राज्यांचे मुख्यमंत्री त्यात सहभागी होते. जेवण झाल्यावर शिंदे यांनी ढेकर दिला की पंतप्रधान मोदींनी जग जिंकले. पण, मोदी जग जिंकत असताना देशात मणिपूर (Mamipur Violence) अजूनही पेटलेले आहे. मणिपुरच्या जनतेची मने मोदी जिंकू शकलेले नाहीत. चीनने (China) लडाखची जमीन गिळली आहे व त्या जमिनीवरून मोदी चिन्यांना मागे ढकलू शकलेले नाहीत. तेव्हा जग जिंकत असताना आपल्या देशात काय जळते ते आधी पाहणे गरजेचे आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
मोदी यांच्या नेतृत्वात दिल्ली घोषणापत्र जारी झाले व त्या घोषणापत्रावर सगळ्यांची सहमती झाली. युक्रेनमध्ये (Ukraine War) युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचा सहभाग असलेल्या बहुतेक सर्व जागतिक परिषदांत संयुक्त निवेदनावर एकमत झाले नव्हते. पण, भारतातील परिषदेचा रशियाचा सहभाग असूनही घोषणापत्र एकमताने मंजूर झाले. दिल्लीच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धात झालेल्या मानवी हानीबद्दल आणि युद्धामुळे जगावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. पण,अशाच प्रकारची मनुष्यहानी स्वदेशात मणिपुरात सुरू आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत, पाचशेच्या आसपास लोक मरण पावले आहेत. युक्रेनच्या मनुष्यहानीइतकीच मणिपूर येथील मनुष्यहानी महत्वाची आहे, असे या लेखात म्हटले आहे.
’40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण..,’; अपात्र आमदारांच्या प्रकरणावर राऊतांचा घणाघात
लोकशाही हा जी 20 चा आत्मा आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे लोकशाहीचे जनक आहेत. जी 20 परिषदेसाठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदींसमवेत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा भाजपवर व त्यांच्या सरकारवर काळाने घेतलेला सूड आहे. गेल्या दहा वर्षांत गांधी व गांधी विचार मारण्याचा प्रयत्न झाला. पण, जगाला दाखविण्यासाठी का होईना, पंतप्रधान मोदी यांना गांधींसमोर झुकावे लागले. कारण, जगाने गांधी विचार स्वीकारला आहे. जी 20 चे यश असे की अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा नवाम मार्ग या परिषदेने दाखवला.
भारत लोकशाहीची जननी असलेल्या पुस्तकाचे वाटप या सोहळ्यात झाले. पण त्यातील लोकशाही म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य या ओळीचे महत्वच उरलेले नाही. निवडणूक आयोगापासून न्याय व्यवस्थेपर्यंत हव्या त्या माणसांच्या नेमणुका करणे आणि त्यांच्या माध्यमातून राज्य करणे हे काही संवादाचे लक्षण नाही. दिल्लीत जग आले, मोदींनी पंगत बसवली पण, त्या पंगतीत भारताच्या लोकशाहीचे ताट रिकामेच राहिले असेच म्हणावे लागेल, असा खोचक टोला ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) लगावला.