Varsha Gaikwad : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेली आरोग्य विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भाभा हॉस्पिटलप्रमाणे राजवाडीतही अनागोंदी कारभार आहे. रुग्णांना औषधे मिळत नाहीत, आयसीयूच्या (ICU) बेड्सची संख्या कमी आहे, हॉस्पिटलमध्ये जवळपास ३० टक्क्यांपेक्षा जास्त स्टाफ कमी आहे,उर्वरित कर्मचाऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने स्टाफ काम करत आहे. हॉस्पिटलच्या नावाखाली केवळ लाडक्या कंत्राटदारांच्या हितासाठी नवीन बिल्डिंग बाधून दिल्या जात आहेत. राज्य शासन व बीएमसी तातडीने आरोग्य सेवा सुधारावी असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी आज राजावाडी हॉस्टिलला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. ४२५ बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये फक्त ११ बेड्स आयसूसाठी आहेत. रुग्णांना औषधे बाहेरून आणावी लागतात. सीटी स्कॅन, USG टेस्ट, MRI टेस्ट, इको टेस्ट, यासाठीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेल्या हॉस्टेलमध्ये काहीच सुविधा नसल्याने हे डॉक्टर बाहेर भाड्याने राहतात. पावसाळा सुरु झालेला असून मलेरिया, डेंग्यू, तापाचे रुग्ण वाढत आहेत पण या रुग्णालयात सुविधा नसल्याने सामान्य मुंबईकर आरोग्य सेवेपासून वंचित रहात आहे. इमारत अतिशय जुनी असून धोकादायक अवस्थेत आहे. जवळपासच्या परिसरात एवढे मोठे हॉस्पीटल नसल्याने हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू राहिले पाहिजे. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रॉय मनी, माजी नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसिन हैदर, नितीन सलागरे, विनी डिसुझा,मुंबई काँग्रेस मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र, बब्बू खान, कचरू यादव, डॉ उस्मानी, केतन शहा, राजेश इंगळे इत्यादी उपस्थित होते.
राजावाडी हॉस्पिटलच्या आवारात नवीन इमारत बांधली जात आहे त्याचे काम काळ्या यादीतील कंत्राटदाराला दिले आहे. या बिल्डिंगसाठी जादा बजेट असल्याचा ठपका ठेवत पेंटकल सल्लागारांनी १.३० कोटी रुपयाचा दंड ठोठावला होता. याचे टेंडर खुले होण्याअगोदरच ते शायोना कार्पोरेशनला मिळणार हे एका माजी नगर सेवकाने महानगरपालिकेकडे तक्रार केली होती पण या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि शायोनालाच हे कंत्राट जास्त किमतीला दिले. भगवती हॉस्पिटलप्रमाणे हे हॉस्पिटलही खाजगी कंपनीला देण्याचे षडयंत्र दिसत आहे, हे कंत्राट रद्द करण्याची मागणी वर्षा खा. गायकवाड यांनी केली आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठीचा हा संशयास्पद टेंडर तत्काळ रद्द करावा आणि नव्यानं पारदर्शक प्रक्रिया राबवावी. यासोबतच महानगरपालिकेनं उपनगरातील सर्व रुग्णालयांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी आणि रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा त्वरित सुरू कराव्यात, जेणेकरून मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार नाही
बीएमसीच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभारा बद्दल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करून सेवा सुधारा व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे पण महानगरपालिका व राज्य सरकार काहीही हालचाल करत नाही. आरोग्य विभागासाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद केली जाते पण त्यातून मुंबईकरांना आरोग्य सेवाही मिळत नाही हे दुर्दैव आहे. हा निधी कोणाच्या खिशात जातो असा प्रश्नही खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.