Download App

‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून विरोधकांनी मोठा गदारोळ करत सरकारला धारेवर धरले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच कंत्राटी भरती करण्याचं पाप हे मविआचं आहे ते आम्ही आमच्या माथी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले.

कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय 2003 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली पहिला जीआर काढला त्यानंतर आणखी एक जीआर 6 हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मविआचं पाप आम्ही आमच्या माथी घेणार नाही. मागील सरकारने युवकांची माफी मागावी. युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाकरे आणि पवारांनी युवकांची माफी मागावी.

Lok Sabha Election : ‘2024 साठी मी तयारच’; राम शिंदेंनी ठोकला विखेंविरोधात शड्डू!

कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस अन् राष्ट्रवादीचं 

कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं असे मी अजित पवार यांनाही सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. कंत्राटी भरतीचे जीआर महाविकास आघाडी सरकारनेच काढले होते. त्यांच्याकडूनच राज्यातील युवकांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा आशीर्वाद 

उद्धव ठाकरेंच्याच सरकारने कंत्राटी भरतीला मान्यता दिली होती. आणि त्यांना शरद पवार यांचा आशीर्वाद होता. या संदर्भातील सगळी कागदपत्रं माझ्याकडं आहेत हा प्रकार मी लवकरच सगळ्यांसमोर आणणार आहे. पण, आपल्याच सरकारच्या काळात जीआर काढायचे आणि नंतर आपणच त्या विरोधात आंदोलन करायचं. याची आंदोलन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

पुण्यात दंगल घडवून आणण्यासाठी गोऱ्हे, नार्वेकरांची चिथावणी; बोरवणकरांचा खळबळजनक दावा

ठाकरे-पवारांनी युवकांची माफी मागावी 

महाविकास आघाडी सरकारच्या काळातच कंत्राटी भरतीचे जीआर काढण्यात आले होते. आता तेच या विरोधात आंदोलन करत आहेत. स्पष्टपणे त्यांच्याकडूनच युवकांची दिशाभूल केली जात आहे. खरेतर या प्रकरणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी युवकांची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत  सांगितले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us