Download App

चंद्रकांत पाटलांना महाजनांची ताकद… खडसेंचा दुसऱ्यांदा गेम होणार?

मुक्ताईनगर

एकनाथ खडसे. भाजपचे (BJP) एकेकाळचे राज्यातील क्रमांक एकचे नेते. 2014 पूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली ती घोषणाही खडसे (Eknath Khadse) यांनीच केली होती. सरकार आल्यानंतर अर्धा डझन खात्याचे मंत्री झाले होते .पण 2016 मध्ये खडसेंच्या मागे शुक्लकाष्ठ लागले ते लागलेच. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यामागे चौकशी आयोग लागले. 2019 मध्ये त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून ज्या राष्ट्रवादीविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्याच राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येण्यास तयार झाले, दिल्लीवारी झाली. पण त्यांचा प्रवेश काही होऊ शकला नाही. यामागे कोण हे अगदी जळगामधील लहान मुलगाही सांगू शकतो. पण आता जरी खडसे यांची वाताहत झाली असली तरी त्यांनी एकेकाळचा हा सगळा मानमरातब मिळवला होता तोच मुळात मुक्ताईनगरच्या आमदारकीच्या जोरावर. खडसे तब्बल 30 वर्षे इथले आमदार होते. पण आता या मतदारसंघात त्यांच्या कन्या तयारी करत आहेत. तर विरोधात महायुतीकडून शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांचं आव्हान असणार आहे. (In Muktainagar Assembly Constituency, there will be a fight between Shiv Sena’s Chandrakant Patil and NCP’s Rohini Khadse.)

नेमकी कशी होऊ शकते या दोघांमधील लढत? काय घडतं आहे मुक्ताईनगर मतदारसंघात? हेच पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या विधानसभा निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

आजचा मुक्ताईनगर मतदारसंघ म्हणजेच जुना एदलाबाद मतदारसंघ. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातून प्रतिभाताई पाटील अनेक वर्ष आमदार होत्या. पण 1984 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले अशांचे विधानसभेला तिकीट कापायचे असा निर्णय घेण्यात आला. यात 1985 च्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांचेही तिकीट कापले गेले. त्यावर्षी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत चौधरी यांचा या मतदारसंघात पराभव झाला आणि समाजवादी काँग्रेसच्या हरीभाऊ जावरे यांनी विजय मिळवला.

रावेरच्या आखाड्यात नव्या भिडूंमध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान चौधरींना थांबवणार?

1990 मध्ये भाजप-शिवसेनेत युती झाली. त्यात जागावाटप समीकरणात हा मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यावर्षीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसच्या मतविभागणीत भाजपच्या एकनाथ खडसे यांनी इथे विजय मिळवला. तेव्हापासून मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला तो आलाच. सहाजिकच जागावाटप हा मतदारसंघ कायमच भाजपकडे राहिला. तर 2004 शरद पवार यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला. पण खडसे कायमच सरस ठरत राहिले. 1990 ते 2019 अशी तब्बल 30 वर्षे एकनाथ खडसे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

1990 च्या दशकात शेठजी-भटजी प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी भाजपने ओबीसी समाजाला आपलेसे केले. याचा फायदा एकनाथ खडसे यांना झाला. लेवा पाटील समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खडसे यांना भाजपने राज्य पातळीवर प्रोजेक्ट केले. काहीच दिवसात खडसे भाजपचे राज्यातील क्रमांक एकचे नेते बनले. युती सरकारमध्ये अर्थमंत्री झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे विरोधी पक्ष नेते झाले. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली ती घोषणाही खडसे यांनीच केली होती. सरकार आल्यानंतर अर्धा डझन खात्याचे मंत्री झाले होते. पण 2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

2019 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ऐनवेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे विधान परिषदेवर आमदार झाले. तर रोहिणी खडसे यांनी 2024 च्या विधानसभेच्या दृष्टीने तयारी चालू ठेवली.

मराठा चेहरा, एक गठ्ठा मतदान; महाजनांविरोधात पवारांच्या डोक्यात खास प्लॅन

या दरम्यान, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत राज्यात सत्तांतर घडवून आणले. ते स्वत: मुख्यमंत्रीही झाले. या सत्तांतर नाट्यात आमदार चंद्रकांत पाटील शिंदेंसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतरच्या काळात पाटलांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना तीन वेळा मतदारसंघात आणले. आज जिल्ह्यात गिरीश महाजन-खडसेंचा वाद नवा नाही. त्यामुळे महाजनांनी या मतदारसंघात जाताना प्रत्येक वेळी खडसेंवर टीका करत चंद्रकांत पाटलांना बळ दिले आहे. आता हा मतदारसंघही शिवसेनेलाच सुटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने या मतदारसंघाती इच्छुकांची नावे केंद्रात पाठवलेली नाहीत. पण भाजपत असतानाही खडसेंना विरोध करणाऱ्या मुक्ताईनगरातील भाजपमधील काही नेत्यांची या मतदारसंघातून लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी उपाध्यक्ष आणि रावेर लोकसभा निवडणूकप्रमुख नंदू महाजन यांचा या मतदारसंघातून लढण्यावर दावा आहे. मात्र, खडसेंना विरोध करणाऱ्या या नेत्यांची चंद्रकांत पाटील आमदार झाल्याने आणि नंतर ते महायुतीत आल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. सध्या तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे विरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत पाटील अशीच लढत राहिल असे दिसते. यात चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने सत्तेचे पाठबळ आहे, सरकारची कामे आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे आहेत. तर रोहिणी खडसे यांच्या मागे एकनाथ खडसे यांचे नेटवर्क, शरद पवार यांना मानणारा वर्ग, त्यांच्यासाठीची सहानुभूती आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us