Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी बोलताना काल अजित पवार यांनी त्या कार्यक्रमाला गेलो यात माझा काय दोष असे म्हणत हास्यविनोदात रंगले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, या प्रकरणात आज सकाळी वैष्णवी हगवणेचे सासरे आणि दीराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. यापुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता त्या त्या सर्व गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडणं या गोष्टी कधीच सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जी कडक कारवाई करता येईल ती सगळी केली जाईल.
“हगवणे कुटुंबाकडून मलाही आमंत्रण मिळालं होतं पण मी..”, सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं?
या प्रकरणात आरोपींवर मकोका लावण्याची मागणी कस्पटे कुटुंबियांनी केली आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मकोका लावण्याकरता त्याचे काही नियम आहेत. त्या नियमात जर बसलं तर मकोका लागू शकेल. पण हे प्रकरण नियमात बसेल की नाही हे आज सांगता येत नाही. आजच्या काळात मुली आणि सुना यांच्यात खरंतर फरक करायला नको. पण आजच्या काळात अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं मला वाटतं हे पाप आहे असे फडणवीस म्हणाले.
एका कार्यक्रमात भाषण करत असताना अजितदादा लोकांना सांगत होते की मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो यात माझा काय दोष असे म्हणत असताना ते हास्य विनोदात रंगले. सरकार म्हणून गंभीर आहे पण अजितदादा त्यात गंभीर असल्याचं दिसत नाही, असे पत्रकाराने विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, अजितदादा गंभीर नाहीत असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कुणाकडे लग्नाला बोलावलं तर आपण जातो. त्यावेळी आपल्याला कल्पना नसते की पुढं काय घडणार आहे. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील यांनाही आज (शुक्रवार) अटक करण्यात आली.