राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
Bandhu : प्रभू श्रीरामासाठी लक्ष्मण फक्त भाऊ नव्हे, तर विश्वासाचा, कर्तव्याचा आणि आयुष्यभराच्या साथीचा जणू आधार. भावा-भावामधलं नातं शब्दांत
Bandhu : प्रभू श्रीरामासाठी लक्ष्मण फक्त भाऊ नव्हे, तर विश्वासाचा, कर्तव्याचा आणि आयुष्यभराच्या साथीचा जणू आधार. भावा-भावामधलं नातं शब्दांत मांडता येत नाही… प्रत्येक भावाच्या नात्यात असतो असाच एक न बोलता जाणवणारा जिव्हाळा, संकटात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याची ताकद आणि सुख-दुःखात कायम सोबत राहण्याचं वचन.
दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका वठविण्यात हातखंडा असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि नामांकित इफ्फी विजेते जितेंद्र जोशी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र. आपल्या सहज, वास्तववादी आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी ‘बंधू’ मधून एका वेगळ्या आणि भावनिक नात्याची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे.
हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे अभिनेता रजत बेदी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.
‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ सारख्या यशस्वी, मनोरंजक आणि आशयघन चित्रपटांबरोबरच भावनिक प्रसंगांची उत्कृष्ट मांडणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’ चित्रपटाच्या लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर जनमाणसात लोकप्रिय होऊ पाहणाऱ्या ‘बंधू’ च्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली असुन त्यांच्या भावनिक, मधुर आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या सुश्राव्य गाण्यांची मेजवानी ‘बंधू’ चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार यात काही शंका नाही.
निगडीत चेंबरमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू
एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट पडद्यावर दोन भावांचं नातं उलगडताना कुठेतरी आपल्या घरातल्या, आपल्या भावाची आठवण करून देणारी ठरणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा…या सगळ्यांचा वेध ‘बंधू’ घेणार आहे. नाती, भावना आणि संघर्षांची ही कहाणी पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच वाटते. प्रेम, संघर्ष, अहंकार, त्याग आणि भावनांची गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ही कथा प्रेक्षकांना २० नोव्हेंबरपासून एका हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासावर घेऊन जायला सज्ज होत आहे.