सरकारने आडमुठेपणा करू नये, 12 तारखेला मुंबईत आंदोलन, जरांगे पाटलांची मोठी घोषणा
सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही, तर न्यायदेवतेकडून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
Jarange Patil’s major announcement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही, तर न्यायदेवतेकडून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील आझाद मैदानावर लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असून, सर्व नियमांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकार स्वतःला सर्वांपेक्षा मोठे समजू लागले असून आपल्या भूमिकेमुळे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून त्रास देत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाज आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. त्यामुळे सरकारने या आंदोलनाकडे संघर्षाच्या भूमिकेतून न पाहता समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईतील आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनासाठी आवश्यक परवानगी देणे हे सरकारचे काम आहे आणि आम्ही नियमांचे पालन करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनाच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी नियमांच्या चौकटीत आंदोलन करण्याची भूमिका मांडली आहे.
एमपीएससी सचिवांना काळं फासल्याने नवा वाद; राधाकृष्ण विखे पाटलांचा संभाजी ब्रिगेडवर निशाणा
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाचाही उल्लेख केला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असाल तर आमच्या आंदोलनात विघ्न आणू नका. सरकार गणपतीला मानणारे असेल, तर आंदोलनात अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आपली मागणी मांडत असल्याने सरकारनेही त्याला सहकार्य करावे, अशी त्यांची भूमिका आहे.
12 तारखेच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक समाजबांधवही अंतरवाली सराटीत मुक्कामासाठी आल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांनी कार्यकर्ते आणि समाजबांधवांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अंतरवाली सराटीत मोठ्या प्रमाणात वाहने आणू नका, जेणेकरून वाहतूक कोंडी किंवा स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
एकीकडे मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने करण्यावर भर दिला आहे. सरकारने अडथळे निर्माण न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. सरकारने न्याय दिला नाही तर न्यायदेवता न्याय देईल, असे म्हणत त्यांनी 12 तारखेच्या मुंबई आंदोलनावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.
’10 दिवस दारू नाही तर, रुग्णालयं भरतील’; पुण्याच्या दारूबंदीवर HC ची मिश्किल टिप्पणी
आता 12 तारखेला मुंबईतील आंदोलनासाठी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, आंदोलनाला परवानगी कशा स्वरूपात दिली जाते आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून काही नवा निर्णय घेतला जातो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.