Explainer : भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; PM मोदींनी दिलेल्या गॅरेंटीत किती तथ्य

Explainer : भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; PM मोदींनी दिलेल्या गॅरेंटीत किती तथ्य

Economy of India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ‘आपण तिसऱ्यांदा सत्तेत येऊ’ असा ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आली आहे. आताही ‘तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या तीन क्रमांकावर आणू’, अशी हमी मोदींनी दिली. पंतप्रधानांच्या या विधानावर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. दरम्यान, भारत कधीपर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो? मागील 9 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था कोठून कोठे पोहोचली? याच विषयी जाणून घेऊ. (when can India become the third largest economy in the world Where has the economy of the country reached in the last nine years)

पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?
बुधवारी दिल्लीच्या प्रगती मैदानावर पुनर्विकसित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (IECC) ‘भारत मंडपम’ चे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून सरकारने केलेल्या कामाचे परिणाम संपूर्ण देश पाहत आहेत. आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला, भारत जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये 10 व्या क्रमांकावर होता. दुसऱ्या टर्ममध्ये, भारत हा आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे, मी देशाला आश्वासन देतो की आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि ही मोदींची हमी आहे.

‘कर्जत येथील नीरव मोदीची जमीन ही…’; रोहित पवारांनी सगळंच सांगितलं 

2014 पासून काय-काय बदलले आहे?
2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा भारत हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातील दहावा देश होता. तेव्हा देशाचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलरच्या जवळ होता. 2023 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात वाढ झालेली दिसते. सध्या देशाचा जीडीपी $3.75 ट्रिलियन झाला आहे. आता भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत सरकारनं 2025 पर्यंत GDP पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे जीडीपी वाढीचा वेग कमी झाला आहे.

मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताने जगातील पाच मोठ्या देशांना मागे टाकले आहे. आता भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. या नऊ वर्षांत भारताने ब्रिटन, रशिया, फ्रान्स, कॅनडा आणि इटलीला मागे टाकले आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चीन दुसऱ्या क्रमांकावर, जपान तिसऱ्या क्रमांकावर तर जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे.

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कधी बनू शकेल?
याबाबत अनेक अहवाल आले आहेत. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीच्या मते, 2027 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2031 पर्यंत, भारताचा GDP आजच्या 3.75 ट्रिलियन वरून दुप्पट होऊन $7.5 ट्रिलियन होईल.

आयएमएफच्या अहवालातही असेच काहीसे सांगितले आहे. IMF च्या अंदाजानुसार भारताचा GDP 2027 पर्यंत $5.4 ट्रिलियन असेल. अमेरिकन गुंतवणूक बँक गोल्डमन सॅककडूनही एक अहवाल आला आहे. त्यानुसार 2075 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तर चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असेल.

तज्ज्ञ  काय म्हणतात?
अर्थतज्ज्ञ याबाबत म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत आर्थिक मंदी वाढली आहे. कोरोना, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारातही मंदीचे सावट पाहायला मिळाले. यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था एकतर वाढत नाही किंवा खाली जाऊ लागली आहे. आकडेवारी पाहिली तर ब्रिटनचा केवळ तीन टक्के, फ्रान्सचा दोन टक्के आणि रशियाचा जीडीपी एक टक्का वाढला ब्राझीलचा जीडीपी 15 टक्क्यांनी घटला. ज्या काळात जगातील अनेक मोठ्या देशांचा जीडीपी वाईट अवस्थेत होता, तेव्हाही आपला देश पुढे गेला. शिवाय, भारतात उत्पादन क्षमताही वाढली आहे.

तज्ज्ञ  पुढे म्हणतात, ‘मोठा जीडीपी असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपण इतर पैलूंवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. विशेषत: दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. या बाबतीत भारत सध्या जगात १२५व्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्न वाढले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा चांगला परिणाम होईल.

तज्ज्ञ सांगतात की,  ‘2014 च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे, पण तरीही आपण खूप मागे आहोत. 2014 मध्ये दरडोई उत्पन्न सुमारे 80 हजार रुपये वार्षिक होते, ते आता 1.70 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मात्र, अजूनही 80 कोटी लोक आहेत ज्यांना सरकार गरीब समजते. भारताची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मजबूत जीडीपीसोबत दरडोई उत्पन्न वाढवणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube