रूपाली ठोंबरे फक्त ‘सोशल’ कार्यकर्त्या, तृप्ती देसाईंची टीका
![रूपाली ठोंबरे फक्त ‘सोशल’ कार्यकर्त्या, तृप्ती देसाईंची टीका रूपाली ठोंबरे फक्त ‘सोशल’ कार्यकर्त्या, तृप्ती देसाईंची टीका](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2022/12/Untitled-design-15.png)
पुणे : ‘रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्ते आहेत. त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्ह्युज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून पार करता आला नव्हता.’ अशी टीका भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली.
‘कसबा मतदारसंघात सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो. लढायची इच्छा कोणीही व्यक्त करू शकतं त्याबद्दल दुमत नाही परंतु “वारंवार दादागिरी करणारा आणि तोंडात सततची शिवराळ भाषा “असणारा कार्यकर्ता/ कार्यकर्ती कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार म्हणून देईल, असे वाटत नाही.’ असं ही तृप्ती देसाई म्हणाल्या.
रूपाली ठोंबरे यांनी नुकतचं कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणुक लागणार आहे. पक्षाने आदेश दिला तर मी ही पोटनिवडणुक लढण्यास तयार आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून मुक्ता टिळक या आजारी होत्या. या आजारपणात देखील त्यांनी जितके शक्य तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता त्यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच तर मतदार ठरवतील नक्की कुणाला निवडून द्यायचं ते, जर माझ्या पक्षाने येथून निवडणूक लढवण्यासाठी मला आदेश दिला तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.
त्यावरून आता रूपाली ठोंबरे यांच्यावर टीका होत आहे. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एखाद्या राजकीय नेत्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधी होण्याआधीच निवडणुकीची चर्चा करणे हे पुण्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही. यामुळे कोणीही याबाबत वक्तव्य करू नये, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरीत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना फटकारलं आहे. तर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली.