पावसाच्या सरीत रंगला कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; मराठी कलाकारांचा उत्साह, मैत्री आणि कलाविष्काराने रंगला अविस्मरणीय दिवस
Zhimmaad : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मात्र, यावेळी हेच कलाकार कॅमेऱ्यापासून दूर
Zhimmaad : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मात्र, यावेळी हेच कलाकार कॅमेऱ्यापासून दूर, पावसाळी वातावरणात एकत्र येत मनसोक्त धमाल करताना पाहायला मिळाले. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘झिम्माड’ या विशेष पावसाळी मेळाव्यासाठी सुबोध भावे, स्वाती चिटणीस, मंदार चोळकर, शशांक केतकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, सुशांत शेलार, शंतनू मोघे, प्रिया बेर्डे, तुषार दळवी, रेशम टिपणीस, भरत दाभोळकर, मकरंद अनासपुरे, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, सागर कारंडे, पुष्कर जोग, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत पानसे, सचित पाटील यांच्यासह अनेक मराठी कलाकार सहभागी झाले होते. पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ येथे रंगलेल्या या सोहळ्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत जुन्या मैत्रीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
सकाळपासूनच कलाकारांच्या आगमनाने ‘डी लश’चा परिसर गजबजून गेला होता. नेहमी शूटिंगच्या धावपळीत भेटणाऱ्या कलाकारांना यावेळी कामाची कोणतीही घाई नव्हती. त्यामुळे मनसोक्त गप्पा, खेळ, नाच-गाणी आणि हास्यविनोद करत कलाकारांनी हा दिवस आनंदात घालवला. पावसाळ्याच्या वातावरणाला साजेशा खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेत सगळ्यांनी या निवांत भेटीचा पुरेपूर आनंद लुटला.
‘झिम्माड’मध्ये मैत्री, पाऊस आणि कलाविष्काराचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. या मैफलीची सुरवात झाली ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने गायिलेल्या गणेशस्तवनाने आणि मग मैफिल खऱ्या अर्थाने रंगायला लागली ती गायक-संगीतकार मिलिंद इंगळे यांनी सादर केलेल्या लोकप्रिय ‘गारवा’मधील कविता आणि गाण्याने. ‘गारवा’च्या शब्द-सुरांनी उपस्थित कलाकारांमध्येही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि उपस्थितांना पावसाच्या आठवणींच्या रम्य प्रवासावर नेलं.
यासोबतच पावसाच्या विविध छटा सुरांतून उलगडणारी विशेष संगीत मैफलही रंगली. आर्या आंबेकर, विश्वजीत जोशी, सावनी रवींद्र आणि अजित परब यांनी लोकप्रिय गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या सुरांना कलाकारांनी उत्स्फूर्त दाद दिली. खास आग्रहास्तव अभिनेता पंढरीनाथ कांबळी आणि आस्ताद काळे यांनी सुद्धा सुरेल गाणी सादर केली. अगदी पुष्कर श्रोत्री याला सुद्धा लोकांनी गाणं सादर करायला लावलं. याशिवाय समीर सामंत आणि मंदार चोळकर यांनी कविता सादर केल्या, त्यामुळे गीत आणि संगीत यांच्या माध्यमातून पावसाळी वातावरणाचा हा संगम ‘झिम्माड’च्या सोहळ्याची खासियत ठरला.
या आनंदाच्या वातावरणात कृतज्ञतेचा भावही तितक्याच आपुलकीने जपण्यात आला. मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा आणि पत्रकारांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, फैय्याज, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, मोहन जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांना कलाकारांच्या वतीने कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या आधीच्या पिढीच्या योगदानाप्रती आदर व्यक्त करणारा हा भावनिक क्षण ठरला. दिग्दर्शक प्रविण तरडे यांना देऊळबंद-२ साठी झिम्माड धुंव्वाधार सन्मान प्रदान करण्यात आला.
‘झिम्माड’मध्ये ज्येष्ठांपासून नवोदितांपर्यंत अनेक कलाकार एका छताखाली एकत्र आले. कलाकार म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा या उपक्रमाचा उद्देश यंदाच्या सोहळ्यातही प्रकर्षाने जाणवला. शूटिंगच्या धावपळीत राहून गेलेल्या गप्पा, जुन्या आठवणी, नव्या ओळखी आणि संगीत-कवितेच्या मैफलीमुळे हा दिवस सगळ्यांसाठी खास ठरला.
या उपक्रमाबद्दल सांगताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, “आपण सगळे वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे कलाकार म्हणून एकमेकांना भेटण्यापेक्षा मित्र म्हणून भेटणं आणि वेळ घालवणं हीच ‘झिम्माड’ची कल्पना होती. यावेळी सगळ्यांनी काम, शूटिंग आणि वेळापत्रक बाजूला ठेवून हा दिवस मनापासून एन्जॉय केला. विशेषतः ज्येष्ठ कलाकारांसोबत वेळ घालवता आला आणि त्यांचा सन्मान करता आला, याचा विशेष आनंद आहे.” ह्या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन मानसी इंगळे यांच्या ‘सुरेल क्रीएशन्स्’ तर्फे करण्यात आलं. जून्या जाणत्या ॲडव्हर्टायझर पराग शहाणे यांची त्यांना साथ होती.
पावसाळ्याच्या निमित्ताने सुरू झालेला ‘झिम्माड’ हा उपक्रम आता मराठी कलाकारांच्या मैत्रीचा आणि एकत्र येण्याचा खास सोहळा ठरत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, पावसाच्या सरींमध्ये, कविता-संगीताच्या साथीने आणि मित्रांच्या सहवासात रंगलेला यंदाचा ‘झिम्माड’ कलाकारांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरला.