अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू; आईसह तिन्ही मुलांचा दुर्दैवी अंत
Dharashiv Ashwini Paul Death Case नळदुर्ग किल्याच्यावरून तीन मुलांसह उडी मारलेल्या कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू.
काही दिवसांपूर्वी अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा बुरुजावरून पडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला होता. अडीच वर्षांची मुलगी क्रांती गंभीर जखमी झाली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचीही प्राणज्योत मालवली. त्यानंतर वीरा हिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाही तिची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारे या घटनेतील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे.
या घटनेनंतर अश्विनी, अजिंक्य आणि क्रांती यांच्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता वीरा हिच्या मृत्यूने या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पती आणि सासऱ्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, अश्विनी पौळ आणि त्यांच्या मुलांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी पती मनोहर पौळ आणि सासरे अंकुश पौळ यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून सुमारे 100 फूट खोल दरीत उडी घेतली होती. या घटनेनंतर अश्विनी पौळ यांच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या
अश्विनी पौळ या महाराष्ट्रातील नामांकित महिला कुस्तीपटू म्हणून ओळखल्या जात होत्या. 2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2008 आणि 2009 मधील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत त्यांच्या नावावर एकूण पाच सुवर्ण आणि सहा रौप्यपदकांची नोंद आहे.
मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप
अश्विनी यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत त्यांच्या वडिलांनी सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. पती आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याने अश्विनी यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे.
मंत्र्यांच्या स्वागतासाठी हार घेऊन गेला अन् नेत्याची 7 लाखांची सोन्याची साखळी गायब, व्हिडिओ व्हायरल
घटनेच्या दिवशी अश्विनी मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर गेल्या होत्या. किल्ल्याच्या परिसरात केक नेण्यास मनाई असल्याने त्यांनी बाहेरच मुलांसोबत केक कापला. त्यानंतर किल्ल्यातील एका दुकानातून मुलांसाठी चॉकलेट घेतल्याचे सांगितले जात आहे. अजिंक्यचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या तोंडात चॉकलेटचा तुकडा असल्याचेही समोर आले. या सर्व हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.