Download App

‘गंगा भागिरथी’ उल्लेखावरुन मंगलप्रभात लोढांची सारवासारव, ‘माझा काही संबंध नाही’

Mangal Prabhat Lodha on widowed woman : विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. यावरुन राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादावर सावरासावर करण्याचा प्रयत्न मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले की एक महिन्यांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्र लिहिले होते. त्यामध्ये विधवा महिलांसाठी चार ते पाच नावे सुचविले होते. त्यावेळीचे पत्र संबंधित विभागाला पाठवले होते. याबद्दल तुमचे मत काय आहे तसेच चर्चा करण्याची सुचना केली होती. त्यानंतर आणखीन काही संघटनांनी माझ्याकडे पत्र पाठवले होते. त्यामध्ये हे पत्र देखील होते. गंगा भागिरथी असा उल्लेख करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही आणि होणार पण नाही, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर यांची Exclusive मुलाखत

महिला आयोगाने पत्र लिहून आम्हाला प्रस्ताव दिला होता. त्यानंतर काही संघटनांनी नावे दिली होती. कोणताही निर्णय झाला नाही. जीआर काढलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. यामध्ये माझा कोणताही सहभाग नाही, असे लोढा यांनी सांगितले. एक महिन्यांपूर्वी आयोगाने हा प्रस्ताव पाठवला होता. रुपाली चाकणकर यांना जाऊन विचारा की तुम्ही कशासाठी नाव चेंज करण्याचा प्रस्ताव दिला होता, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सरकावर जोरदार टीका केली होती. त्यांनी आपल्या फेसबुख पोस्टमध्ये म्हटले होते की, हा निर्णय हास्यास्पद आहे. विधवा महिला यांना गंगा भागीरथी म्हणावे का? असे महिला बालकल्याण मंत्री यांचे आजचे पत्र एकाचवेळी हास्यास्पद व चुकीचा दृष्टीकोन असणारे आहे. अपंगांना दिव्यांग म्हणा, दलितांना हरिजन म्हणा हे शब्द बदलून वास्तव बदलते का? शब्द टोचण्यापेक्षा तुम्हाला वास्तव टोचले पाहिजे.

ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तविक विधवा शब्द जर त्यातील अपमानकारक सामाजिक वास्तव बदलले तर खटकणार नाही..तो वैवाहिक स्थिती सांगणारा शब्द आहे. जसे घटस्फोटित, परित्यक्ता शब्द आहेत तसा हा शब्द आहे. पण त्या महिलांना इतके अपमानाचे जिणे जगावे लागले की त्या शब्दाची भीती वाटायला लागली व ते वास्तव बदलण्यापेक्षा मग शब्द बदलून समस्या सोपी केली जाते.

गंगा भागीरथी हे तर अधिक हास्यास्पद आहे. म्हणजे पती वारला की महिला नदी इतकी पवित्र होते? आणि पती असताना मग ती कोणती नदी असते? स्त्रियांचे असे सतत वेगवेगळे दैवतीकरण करायचे आणि दुसरीकडे मात्र वास्तव तसेच ठेवायचे असा हा आपला सामाजिक सरकारी व्यवहार आहे..विधवा याच शब्दात त्या महिलांचे वास्तव नीट समजते तो राहू द्या,त्या महिलेचा सामाजिक अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मग शब्द बदलण्याची गरज वाटणार नाही.

Tags

follow us