99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; पुण्यातील बैठकीत एकमताने निर्णय

  • Written By: Published:
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; पुण्यातील बैठकीत एकमताने निर्णय

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: यंदाचे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सातारा शहरात होणार आहे. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची रविवारी पुण्यात बैठक झाली आहे. या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी जाहीर केलीय.

उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी यावेळी उपस्थित होते. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने तीन दिवस राज्यातील काही संस्थांना भेटी दिल्या होत्या.


या संस्थांमध्ये होती रस्सीखेच

साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी अनेक संस्था शर्यदीत होत्या. सदानंद साहित्य मंडळ – औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद – शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा- कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी (सातारा) या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची पुण्यात बैठक झाली. त्यानंतर सातारा शहरात साहित्य संंमेलन घेण्याची घोषणा करण्यात आलीय.


साताऱ्यातील हे चौथे संमेलन

साताऱ्याला 32 वर्षांनंतर पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती. त्याचा प्रयत्नाला यावेळी यश आलंय. यापूर्वी 1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले. संंमेलनाचे नियोजित स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube