Sayaji Shinde : ‘देशाला ब्रिटीशांपेक्षा आपल्याच पुढाऱ्यांनी जास्त लुटलं’

Sayaji Shinde : ‘देशाला ब्रिटीशांपेक्षा आपल्याच पुढाऱ्यांनी जास्त लुटलं’

बीड : मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. (Sayaji Shinde.) अनेक चित्रपटातं त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांचा मोठा फॅन्सवर्ग आहे. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणारे सयाजी शिंदे हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. ते संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वृक्षरोपणाच्या कार्यासाठी ओळखले जातात. प. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात वृक्ष लागवड करून त्यांनी मोठं काम केलं. आपल्या या कामामुळं त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला. ते कायम त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळं ते कायम चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आलेत. नुकतचं त्यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, आपल्या देशाला ब्रिटीशांपेक्षा आपल्याच पुढाऱ्यांनी पोखरून टाकलंय.

सयाजी शिंदे हे वृक्षरोपणासाठी कायम वेगवेगळ्या स्वरुपाचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या देवराई या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक भागात देवराया उभ्या केल्या. याच संस्थे अंतर्गत बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात सयाजी शिंदे हे देखील सहभागी झाले होते. त्यावेळी बोलतांना देशातील वृक्षतोडीवर भाष्य केलं. ते म्हणाले, वृक्षतोडीसंदर्भात सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांना दहशत बसेल असे कडक कायदे करावे…. वन कायदे हे रिवाईस झाले पाहिजेत ही मागणीही आपण सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वृक्ष लागवडीसह मागच्या 70-75 वर्षाचा हिशोब काढला तर ब्रिटीशांपेक्षा आपल्या या देशाला आपल्याच पुढाऱ्यांनी जास्त लुटलं, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.

खेळाडूंसाठी अजितदादा मैदानात: नुसतीच बक्षिसांची घोषणा, गौरव कधी करणार?
माणसाला जगण्यासाठी लागणार प्राणवायू झाडे पुरवतात. मात्र, माणूस आपल्या स्वार्थापोटी वृक्षांवर कुऱ्हाड चालवतो. पर्यावरणातील मानवाच्या हस्तक्षेपामुळं पर्यावरणाचे अतोनात नुकसान होतेय. जंगलतोडीचा आपल्या पर्यावरणावर मोठा परिणाम होतांना दिसतो. आपल्या हव्यासापोटी पर्यावरणातील घटकांचा मानवाने अतीवापर केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. म्हणून निसर्गाशी संबंधित कायदे सुधारले पाहिजेत आणि सरकारनेही त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. झाडे तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे असले पाहिजेत. सरकारी कर्चचारी असो वा सामान्य नागरिक वृक्षतोडीसंदर्भात कठोर कायदे करा, अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच देशातील भ्रष्टाचारावर भाष्य करताना आणि राजकारणावर भाष्य करताना सयाजी शिंदे म्हणाले की, भरपूर पैसे कमावण्याचा आजार अनेकांना जडला आहे. नोकरी व्यतिरिक्त पैसा कमवू हा एक प्रकारचा रोगच आहे, असं शिंदे म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेचे शंभर शंभर वर्षाचे वृक्ष तोडणे हे चुकीचे आहे. विकास ह्या गोंडस नावाच्या शब्दाखाली जी काही भोवताली वृक्षतोड होते, ते पाहून असं वाटतं की, आपण आपल्याच विध्वंस करत आहेत. झाडं फक्त माणूस तोडतो, इतर कुठला सजीव वृक्ष तोडत नाही. निसर्गातील वृक्षांना धक्का न लावता विकास नाही का, साधता येणार, यावरही आपण चिंतन करणं गरजेचं आहे. वृक्ष संवर्धनासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube