क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!
व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने 'मॉडर्न क्लासिक' ठरले आहे.
The great glory of the play ‘Bhumika’ : समकालीन भारतीय रंगभूमीवर बहुचर्चित ‘भूमिका’ हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने ‘मॉडर्न क्लासिक’ ठरले आहे. विविध प्रकारच्या अस्मिता टोकदारपणे जपणाऱ्या अराजकसदृश समकालीन पर्यावरणात मानवतेचे, विवेकाचे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य ठसठशीतपणे अधोरेखित करणाऱ्या या नाटकात प्रबोधनाची अफाट क्षमता आहे आणि म्हणूनच या नाटकाचा समावेश करण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे.
अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर यांनी 21 वर्षांनंतर या नाटकाद्वारे रंगभूमीवर दमदार पुनरागमन केले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक कलाकाराच्या आयुष्यातील मानसिक गुंतागुंत आणि वास्तव व अभिनय यातील पुसट होत जाणारी रेषा प्रभावीपणे मांडते. नुकताच या नाटकाला मानाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे. ‘भूमिका’ने आतापर्यंत विविध विभागांत 15 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे, या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले होते.
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती
अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी या नाटकाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे, ज्यात प्रामुख्याने आदरणीय प्रकाश आंबेडकर, जावेद अख्तर, परेश रावल, विकास दिव्यकीर्ती, आय पी एस पानोज कुमार शर्मा, आशुतोष गोवारीकर, कुमार केतकर, फिरोज अब्बास खान यांचा समावेश आहे: अवघ्या एका वर्षात ‘भूमिका’ने 125 प्रयोग पूर्ण केले आहेत.
NMACC मध्ये विशेष प्रयोग
या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, ‘भूमिका’ नाटकाला मुंबईतील प्रतिष्ठित ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) येथे प्रयोगासाठी निमंत्रित करण्यात आले आहे:
स्थळ: द ग्रँड थिएटर, NMACC, मुंबई
दिनांक: 22 मे, 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे आता भावी पिढीला क्षितिज पटवर्धन यांच्या लेखनाचे आणि समकालीन नाटकाच्या संरचनेचे सखोल अध्ययन करता येईल.