स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या ‘बंधिनी’ चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी
सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो.
The story of a woman’s emotional world : मराठी चित्रपटांत स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या उत्तमोत्तम चित्रपटांची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेणारा ‘बंधिनी’ हा चित्रपट येत्या 9 ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित ‘बंधिनी’ हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो. देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा संवेदनशील वेध घेते.
‘बंधिनी’ ही केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नसून, प्रत्येक नात्यामधील प्रेम, त्याग आणि आत्मसन्मानाचा अर्थ नव्याने उलगडणारी भावनिक सफर आहे. चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या प्रभावी अभिनयातून ही कथा अधिक सशक्तपणे उलगडणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरीकर म्हणाले, “आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्नं आणि कुटुंबाची जबाबदारी यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असते. ‘बंधिनी’ ही अशाच एका स्त्रीची कथा आहे, जी अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडली जाईल. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि मनाला स्पर्श करणारा चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था
‘बंधिनी’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नाही, तर प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःमध्ये पाहायला लावणारा अनुभव आहे. या चित्रपटाचा विषय आणि सादरीकरण प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता सतीश वाघेला यांनी व्यक्त केला. या चित्रपटात प्रमुख कलाकारांसोबत प्रसाद सुर्वे, अविनाश किर्ती, मिलिंद संगावार, धीरज बिडवे, मनोज चौधरी, गोरक्ष लोखंडे, आदित्य साळुंखे, रोहित भिंगारे, प्रताप कोलते, शीतल पाटील, शीतल ओसवाल, रश्मी व्यहारे आणि आरती पवार हे सहकलाकारही झळकणार आहेत.
‘बंधिनी’ चित्रपटाचे संगीतकार रोहन पगारे असून संगीत संयोजन प्रशांत शांताराम नांदगावकर यांनी केले आहे. कविता कृष्णमूर्ती, राहुल देशपांडे, वैशाली सामंत आणि देविका पणशीकर यासारख्या मात्तबर गायकांच्या सुरेल स्वरांनी गीतांना ‘चारचाँद’ लावले आहेत.