आयफोन नव्हे, 6 वर्षांचा कौटुंबिक वाद ठरला कारणीभूत? चांदवडे कुटुंबाच्या मृत्यूचे नवं कारण समोर
Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain आयफोनमुळे कुणालने जीवन संपवले नसून कौटुंबिक वादामुळे जीवन संपवले, असा दावा केला जातोय.
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain: छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर आई-वडिलांसह कुणाल चांदवडे (Kunal Chandawade) या तरुणाने दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या घटनेमागे आयफोन (iPhone) आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेला वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र, पोलिसांनी या चर्चेचे खंडन केले असून, आता कुटुंबातील मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाची माहिती समोर आली आहे.
कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता अशी मृतांची नावे आहेत. मुरलीधर हे ट्रकचालक होते, तर संगीता गृहिणी होत्या. या दाम्पत्याला दोन मुले होती. मात्र, सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर मोठे संकट आले आणि त्यानंतर घरातील वातावरणात सातत्याने तणाव निर्माण होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नवीन सिम कार्ड घेणार असाल तर नियम जाणून घ्या; आता बायोमेट्रिक पडताळणीही आवश्यक
कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे मुरलीधर अनेकदा घरापासून दूर राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. ते मागील तीन महिन्यांपासून बाहेरगावी होते आणि घटनेच्या दोन दिवस आधीच घरी परतले होते. घरी आल्यानंतर कुणाल आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून कुणालने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या दाव्याला दुजोरा नसल्याचे स्पष्ट करत आयफोनच्या चर्चेचे खंडन केले होते.
मोठ्या भावाचा मृत्यू, अनेक वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक तणाव आणि वडील घरी परतल्यानंतर झालेला वाद या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, या घटनेत कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने घरातील परिस्थिती आणि घटनेपूर्वी नेमके काय घडले, याबाबत प्रत्यक्ष माहिती देणारा कुटुंबातील सदस्य आता उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिस तपासातूनच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दीपिका पादुकोण पूर्ण कथा ऐकल्याशिवाय कधीही कोणत्याही चित्रपटासाठी कमिटमेंट करत नाहीत