शिक्षण क्षेत्रात देशात प्रथमच उभारण्यात आलेल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन 12 मार्चला
देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आली.
‘Life Transformation Center’ to be inaugurated on March 12 : ‘व्यक्तीचा (आत्म्याचा) मातीशी संबध जोडणे’ हा मुख्य धागा पकडून देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे ‘जीवन परिवर्तन केन्द्र’ (लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर). याची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आली आहे. स्व.उर्मिला वि. कराड यांच्या स्मृतिप्रित्यार्थ उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर (एलटीसी) चे उद्घाटन गुरूवार, दि. 12 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वा. होणार आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. अशी माहिती एलटीसीचे संकल्पक व निर्माते युवा शिक्षण तज्ज्ञ डॉ. राहुल वि. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. एलटीसीच्या उद्घाटन प्रसंगी पतांजली योगपीठाचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ले. जनरल धिरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) जनरल ऑफिस कमांन्डिंग इन चीफ साउथन कमांड आणि राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याच प्रमाणे आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अॅड. राहुल कुल, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड, सरपंच नंदकिशोर पाचपुते, महाराष्ट्र स्टेट ग्राम पंचायत ऑफिसर्स युनियनचे अध्यक्ष संजीव निकम आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कृषी(शेती)आणि प्रकृति (Agriculture and Nature ), शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ (Physical Fitness and Sports ), संघ निर्माण आणि नेतृत्व (Team Building and Leadership), देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण (Patriotism and Nation Building ), व अध्यात्म आणि शांती (Spirituality and Peace ) या 5 स्तंभावर आधारित या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्या बरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड असलेला प्रयोग आहे.
राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा; शरद पवार यांच्या मालमत्तेचा आकडा जाहीर
सशक्त भारत आणि विश्वाच्या निर्मितीसाठी प्रत्येक युवकामध्ये परिवर्तन घडविण्याचे मुख्य लक्ष्य निर्धारित करून एलटीसीचे निर्माते व युवा शिक्षण तज्ञ डॉ. राहुल कराड यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल या ठिकाणी 150 एकरपेक्षा अधिक कार्यक्षेत्रामध्ये या केंद्राची स्थापन केली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आत्म शोधासाठी मदत करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी परिसंस्था आहे. आत्म्याचा मातीशी संबंध जोडणे या तत्वावर आधारित ही संकल्पना आहे.
या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिले जाणारे प्रशिक्षण हे अनुभवाधारित असेल. जीवनातील प्रत्यक्ष आव्हाने समजून घेऊन त्यावर आधारित म्हणजे समस्या आधारित शिक्षण दिले जाईल. देशाचा सजग नागरिक बनण्यासाठी व पर्यावरणाभिमुख शिक्षण दिले जाईल. आधुनिक जगात प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल व सोशल मिडियाच्या प्रभावाखाली असून तो अत्यंत गतिमान जीवनशैली व्यतीत करीत आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात ताण-तनाव निर्माण झाला आहे. या सेंटरमध्ये ‘किमानता’ हे एक महत्वाचे उद्दिष्ट्ये असून येथे साधी राहणी, अनावश्यक गोष्टी कमी करुन किमान अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्यास शिकविले जाईल.
आजच्या डिजिटल युगात वेगावान जीवनशैली, सततची माहितीची गर्दी आणि स्पर्धेचा ताण यामुळे तरुणांचा निसर्ग, समाज अणि स्वतःच्या अंतर्मनाशी असलेला संबंध कमी होत असल्याची जाणीव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एलटीसी तरुणांना थोडे थांबवून, स्वतःकडे आणि जीवनाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रवृत्त करते. साधेपणा मितव्ययिता आणि जागरुक जीवनपद्धती या संकल्पना येथे अनुभवातून रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, डॉ. दत्ता दंडगे आणि डॉ. श्रुती निगुडकर उपस्थित होते.
