“आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले?

“आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले?

Raj Thackeray : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार आज किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कुटुंबासह हजर होते.

त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं.

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजून ही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील. मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं.

मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती… हा सुवर्णक्षण पुढील अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे.

Video : सरकाराच्या कामात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना, असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube