Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 78 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर शंभर पेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात यशही मिळाले आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसात या गावावर मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले होते. यापैकी चार जणांवर एमजीएम, चार जणांवर खालापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 जणांना आता घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जखमींवर उपचार केले.
यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन नागरिकांचे स्थालांतर
इर्शाळवाडीतील घटनेला आता चार दिवस उलटले आहेत. घटना घडली तेव्हा शंभरपेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात होते. हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने गावात जाण्यासाठी रस्ताही नव्हता. त्यामुळे पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. हातात टिकाव, फावडी घेऊन हातानेच ढिगारे उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. सरकारी यंत्रणाही मदतीला आल्या. अशा परिस्थितीत बऱ्याच जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले.
या परिस्थितीत मृतांच आकडाही वाढत होता. चार दिवसांच्या बचावकार्यात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचविता आले नाही. येथे मदतकार्य अजूनही सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारी यंत्रणा या कामात गुंतल्या आहेत. पावसाचे दिवस असल्याने साथीचे रोग पसरू नयेत यासाठी औषध फवारणी करण्यात आली आहे. आणखीही आवश्यक उपाययोजना या ठिकाणी केल्या जात आहेत.
श्रीकांत शिंदे ते अनुराधा पौडवाल : इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी सरसावले हात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.