चौथी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी; मुंबई उच्च न्यायालयात 18 कुक पदांची भरती
या पदासाठी सामान्य प्रवर्गातील 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई उच्च (Job) न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात कुक अर्थात स्वयंपाक्याच्या 18 पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली असून उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीत दिव्यांग उमेदवारासाठीही 1 पद राखीव आहे.
कुक पदासाठी केवळ शैक्षणिक पात्रता असून उपयोग नाही, तर विविध प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनविण्याचा अनुभवही आवश्यक आहे. कुकिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून त्यांच्याकडे संबंधित प्रमाणपत्र असणे अपेक्षित आहे. याशिवाय 3 किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये कुक किंवा शेफ म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे.
या पदासाठी सामान्य प्रवर्गातील 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. न्यायालयातील किंवा सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र वयोमर्यादेची अट लागू नाही. या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. मात्र, निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध नसून उमेदवारांना स्पीड पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून भरतीचे नोटिफिकेशन आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो काळजीपूर्वक भरावा. अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कुक म्हणून काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आणि कौटुंबिक घोषणा पत्र जोडावे. सरकारी कर्मचारी असल्यास संबंधित कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्रही द्यावे लागेल.
भरलेला अर्ज व्यवस्थापक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, बेंच औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009 या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. अर्ज 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. अर्जात उमेदवाराला स्वतःला बनविता येणाऱ्या 5 पदार्थांची नावे नमूद करावी लागणार असून 5 रुपयांचे डाक तिकीटही लावावे लागणार आहे. त्यामुळे चौथी उत्तीर्ण असून स्वयंपाकाची आवड आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरणार आहे.