शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून जोरदार हल्लाबोल

शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून जोरदार हल्लाबोल

मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामनातून ( Saamna )जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्र (Central Government)आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग असल्याचं म्हटलंय. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, असंही सामनातून म्हटलंय.

आज सामनात म्हटलंय की, महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. त्यांच्या बाता विकासाच्या असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हक्काचे हिरावून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत. आता या पळवापळवीत आसाममधील भाजप सरकारची भर पडली आहे. या सरकारने महाराष्ट्रातील एका ज्योतिर्लिंगावरच मालकी हक्काचा दावा ठोकला आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचे आहे, असे आसाम सरकारने म्हटले आहे. 18 फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आसाम सरकारने वृत्तपत्रांमध्ये काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात हा अजब दावा करण्यात आला आहे. देशभरात एकूण 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत.

Supreme Court : उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी द्यायला हवी होती; शिंदे गटाचा कोर्टात युक्तिवाद

त्यातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममधील डाकिनी टेकडीवर वसले आहे, असा जावईशोध आसाम सरकारच्या पर्यटन विभागानं या जाहिरातीद्वारा लावला आहे. वास्तविक पुण्याजवळील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आहे, ही खूप जुनी मान्यता आहे. शिवलीलामृत, शिवपुराण आणि इतर मान्यताप्राप्त धार्मिक ग्रंथांत सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. भीमाशंकर हे ठिकाण सहय़ाद्री पर्वताच्या प्रमुख रांगेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु तेथे ती गुप्त होते आणि काही अंतरावर जंगलात पुन्हा प्रगट होते, अशी मान्यता आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेले भीमाशंकर मंदिर सुमारे 1200 वर्षे जुने आहे आणि त्याची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी हे एक आहे आणि आता कोण कुठले म्हणत आहे की, सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नसून आसाममधील आहे. हा महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार आहे.

बरे, सहावे ज्योतिर्लिंग जर आसाममध्ये असल्याचा तुमचा दावा आहे तर मग ही उचकी तुम्हाला आताच का लागली? हा ‘साक्षात्कार’ तुम्हाला आधी का झाला नाही? आतापर्यंत असंख्य महाशिवरात्री आल्या आणि गेल्या. ना तुम्ही असा दावा केला ना त्याच्या पानभर जाहिराती छापल्या. मग आताच हा नसता उपद्व्याप आसामच्या भाजप सरकारने का केला? या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे; कारण या सर्व फुटिरांना आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथे ‘राजाश्रय’ मिळाला होता. ‘काय झाडी, काय हाटील…’ अशी जंगी बडदास्त ठेवली गेली होती. तेथील मुक्कामापासून कामाख्या मंदिरातील ‘विधीं’पर्यंत आसाम सरकारने मिंधे गटाचा खासा पाहुणचार केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही.

या पाहुणचाराच्या बदल्यातच भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांना देऊन आला नाहीत ना?’ या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नालाही त्यांच्याकडे काय उत्तर आहे? आधी दिल्लीने मिंधे गटाचा स्वाभिमान आणि अभिमान पळवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या हक्काच्या गोष्टींची जी पळवापळवी सुरू झाली आहे ती थांबायलाच तयार नाही. महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेले मोठे प्रकल्प, उद्योग यांच्या नाकासमोरून गुजरातने
नेले.

आता आसाम सरकारने यांच्या नाकावर टिच्चून आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर मालकी हक्क सांगितला आहे. मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांची ही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे. महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे काही द्यायचे नाही, हक्काचे उद्योग, प्रकल्प इतर भाजप राज्यांत पळवून न्यायचे आणि येथील जनतेच्या प्रखर विरोधाकडे दुर्लक्ष करीत विनाशकारी ठरणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारायचे. देशाची ‘आर्थिक राजधानी’ हा मुंबईचा ‘मुकूट’ हिरावण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. मुंबईचे जागतिक वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेले ते त्यासाठीच. एका भाजपशासित राज्यात झालेली फिल्मसिटी उभारण्याची घोषणा बॉलीवूड मुंबईचे महत्त्व आणि जागतिक सिनेउद्योगाला असलेली मुंबईची झळाळी कमी करण्याचेच उद्योग आहेत. माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर तर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे.

देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले! आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube