कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंती-पुण्यतिथीचा सरकारला विसर, सरकारी यादीत उल्लेखच नाही
Supriya Sule : राज्यात शिक्षणाची पाळंमुळं जा व्यक्तीने रूजवली, ज्या व्यक्तचीने गरिबांसाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या जयंती-पुण्यतिथीचा राज्य सरकारला विसर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली. सरकारी कार्यालयात साजरा करणाऱ्या जयंती पुण्यतिथींच्या यादीत कर्मवीरांच्या जयंती-पुण्यतिथीचा साधा उल्लेखही नसल्याची बाब खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) समोर आणली.
शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालये येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंती आणि पुण्यतिथी यांच्या यादीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती व पुण्यतिथीचा समावेश नाही. शिक्षणाच्या परिघाबाहेर असणाऱ्या प्रत्येकांसाठी शाळा सुरु करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्य वेचले.… pic.twitter.com/anAq61g7Ac
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2023
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहिलं की, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालयात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंती आणि पुण्यतिथींच्या यादीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती व पुण्यतिथीचा समावेश नाही. शिक्षणाच्या परिघाबाहेर असणाऱ्या प्रत्येकांसाठी शाळा सुरू करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्य वेचलं. त्यांच्या या कार्यामुळं महाराष्ट्रात शिक्षणाचा अभूतपूर्वी प्रसार झाला. त्यांचा शासनाच्या या यादीत समावेश होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, कृपया त्यांचा या यादित समावेश करावा, असं ट्वीट त्यांनी केलं.
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी यांच्यासह अनेक महापुरूषांची महाराष्ट्र घडवला. यातलं एक उल्लेखणीय नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटलांचे नाव या समाजसुधारकांच्या यादीत घातल्याशिवाय, ही यादीच पूर्ण होत नाही.
कर्मवीर पाटलांनी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले आणि त्याचं आता वटवृक्षात रुपांतर झालं. कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य गरीब मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज त्यांच्या विचारांवर आधारित अनेक शाळा आणि शैक्षणिक संस्था आहेत. मात्र, सरकारला त्यांच्या जंयती आणि पुण्यतिथीचा विसर पडला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर सरकार काय कार्यवाही करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.