Mansoon : बळीराजा सुखावला! सर्वदूर पावसाची ‘मुसळ’धार; नद्या, ओढे तुडूंब वाहु लागले…
मान्सूनने सलग हजेरी लावल्याने राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसत असल्याचं चित्र आहे.
Mansoon : मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्राला अखेर मान्सूनने (Mansoon ) व्यापले आहे. राज्यातील अनेक भागांत मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाच्या धारा बरसत असल्याचं चित्र आहे. या मुसळधार पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्या भरुन वाहू लागल्याची परिस्थिती आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, परभणीसह वर्धा जिल्ह्यांत पावसाची मुसळधार पडत असल्याने इथले नद्या, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहु लागले आहेत. मान्सूनने दमदार एन्ट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून सर्वसामन्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, ओसंडून वाहत आहेत. मागील दोन दिवसांपासून अकोल्यात जोरदार पाऊस बरसत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाचा रुद्रावतार पाहयाला मिळाला आहे. सोयगावच्या जरंडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं असून जरंडीवळील मातीचा पूलही वाहून गेल्याची समोर आलंय. पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना येण्यासाठी जाण्यासाठी अडचणी येत आहे.
तर परभणी जिल्ह्यातील चांगलाच पाऊस झाला असून शेतकऱ्याची जमीन ओली झालीयं. पहिल्याच पावसात ओढे नाले तुडूंब वाहू लागले आहेत. परभणीच्या आडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नागरिकांचं जनजीवन काहीसं विस्कळीत झाल्याची स्थिती आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये चार तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जळगावात पूरस्थिती आल्याचं चित्र आहे. तसेच रावेरच्या खिरवड नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यासोबतच वर्ध्यातही जोरदार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर शहरातील भागांमध्ये रस्त्यावरच पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा धऱण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीसदृश पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, अनेक दिवसांपासून शेतकरी वर्ग मान्सूनच्या प्रतिक्षेत होता तर शहरी भागातील नागरिक उकाड्याने वैतागले होते. मान्सूनने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला असून शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वेग आलायं, तर दुसरीकडे नागरिकाना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.