‘सामना’तून निवडणूक आयोगाच्या निकालावर जोरदार हल्लाबोल

‘सामना’तून निवडणूक आयोगाच्या निकालावर जोरदार हल्लाबोल

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निकालावर आणि ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’तून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. न्याय झाला नाही, निकाल विकत घेतला, असा आरोप सामनातून (Saamana Editoral) करण्यात आलाय. शिवसेना (Shiv Sena) ही ठाकरेंचीच होती, आहे आणि राहील, असा विश्वासही सामनातून व्यक्त करण्यात आलाय. त्याचबरोबर शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला (Maharashtra) मान्य नसल्याचं थेट सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आलंय.

सामनात म्हटलंय की, निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव, चिन्हाचा निकाल मिंध्यांच्या बाजूनं दिला तरी, शिवसेना ही ठाकरेंचीच होती, आहे आणि राहील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतलं आणि आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला ही कसली लोकशाही? असं म्हणत थेट शिंदे गटावर टीका केलीय.

शिवजयंतीला दिल्लीच्या ‘जेएनयू’मध्ये पुन्हा गोंधळ

शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही, न्याय झाला नाही आणि निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरं काय होणार? लढाई सुरूच राहील, असंही सामनाच्या अग्रलेखातून ठणकावून सांगण्यात आलंय.

विकत घेतला न्याय, या हेडींगच्याखाली आज सामना वृत्तपत्रात अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ठाकरेंकडून शिंदे गटाकडं गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.

शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळय़ांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाह्यां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी काढला. छत्रपतींचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे.

बेइमान व गद्दारांना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढ्यात त्यांची प्रतिज्ञापत्रे ‘ट्रक’ भरून पाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी असल्याचा आरोप केलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube