राज्यात मतदार याद्यांचा नवा घोळ; विरोधकांची पत्रकार परिषद संपताच धक्कादाय माहिती समोर
निवडणूक येत असल्याने निवडणूक आयोगाने प्रारूप यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात प्रकाशित करायला पाहिजे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. (Commission) युती आणि आघाडीची गणितं जुळवून पाहिली जात आहेत. ही निवडणूक लक्षात घेऊन विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज (15 ऑक्टोबर) राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा गंभीर आरोप केला. यावेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाला काही उदाहरणंदेखील दिली आहेत. असं असतानाच आता राज्यातील जळगाव, अमरावती तसंच इतर ठिकाणाहून मतदारयाद्यांमध्ये घोळ असलेल्याचं समोर आलं आहे
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील 19 गावे मतदार यादीतून गायब असल्याचं समोर आलं आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी तक्रार केल आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांना निवडणुकीत उभे राहायचे असल्याने त्यांनी मतदार यादी तपासली असता मतदार यादीतून मतदारांची नावे नव्हे तर अख्खे 19 गावेच गायब असल्याचे पुढे आले आहे. आमच्या या भागातील मतदान विरोधी पक्षाला मिळत असल्यामुळे जाणीवपूर्वक गावाची नावे गायब केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक येत असल्याने निवडणूक आयोगाने प्रारूप यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात प्रकाशित करायला पाहिजे. मात्र कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात प्रारूप यादी प्रकाशित न झाल्याची धक्कादायक माहितीही पुढे आलेली आहे. एकट्या अंजनगाव तालुक्यात 19 गावे गायब असतील तर संपूर्ण जिल्ह्यात किती गावे मतदार यादीतून गायब असतील याची चौकशी करावी अशी मागणी माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर याद्या अपलोड झाल्या नाहीत.
आम्ही कसलीही हुकूमशाही मान्य करणार नाही; राज्य निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे आक्रमक
ज्या दिवशी या याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना त्याची कल्पना आली होती. ज्या याद्या राहिलेल्या आहेत त्याचे कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा अपलोड करत आहोत. कोणतेही गाव, कोणते नाव, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचं काम सुरू आहे. ही प्रारूप मतदार यादी होती. ही अंतिम मतदार यादी नव्हती. तांत्रिक अडचणीमुळे जे काही राहिले असेल ते आता दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या आधी जो भाग सुटला आहे तो नव्याने अपलोड करत आहोत, असे स्पष्टीकरण ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱ्याने दिले आहे.
खासदार राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतील कथित घोळ समोर आणला. आता हेच प्रकरण आता पुन्हा समोर आले आहे. वगळलेल्या 6850 मतदारांची नावे नोंदविणारे आरोपी निवडणूक आयोगाने अजूनही शोधले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात पोलीस तक्रार, प्रशासन तक्रार आणि निवडणूक आयोगाला तक्रार करूनही चौकशी होत नाहीये. असा या मतदारसंघातून पराभूत झालेला काँग्रेस उमेदवार माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे. ही जागा 3054 मतांनी जिंकणाऱ्या भाजपाचे आमदार देवराव भोंगळे यांनी चौकशी करून नावे वगळली असा खुलासा केला.
जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेतही प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. शहरातील तीन हजार मतदारांनी प्रारूप यादीवर हरकती नोंदवल्या आहेत. मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांची आता नगरपालिकेकडून छाननी सुरू आहे. प्रभागातील एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या प्रभागात गेले आहे. अशा विविध चुकांमुळे तीन हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या असून प्रशासनाने त्या दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.