India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?

India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?

India China Conflict : चीन (China) काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहालया मिळत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननं आता मोठं पाऊल उचललं आहे. चीन सरकारने सोमवारी (28 ऑगस्ट) अधिकृतपणे एक नवीन नकाशा (China New Map) जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश असल्याचं दाखवलं आहे. अर्थात, चीनने भारताच्या भूभागावर दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षीच्या एप्रिलमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांचे नाव बदलण्यास मान्यता दिली होती.

ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नव्या नकाशामध्ये भारताच्या काही भागांव्यतिरिक्त चीनने तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राचाही चीनच्या भूभागात समावेश केला आहे. नकाशामध्ये चीनने नाइन-डॅश लाइनवर आपला दावा सांगितला आहे. अशा प्रकारे त्यांनी दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर त्यांचा दावा केला आहे. दरम्यान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया आणि ब्रुनेई हे दक्षिण चीन समुद्रातील भूभागावर दावा करत आहेत.

नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने जारी केलेला नकाशा
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने सोमवारी झेजियांग प्रांतातील डेकिंग काउंटीमध्ये नकाशा जारी केला, असे चायना डेलीचे वृत्त आहे. दरम्यान, चीन नॅशनल मॅपिंग अवेअरनेस वीक साजरा करत आहे. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे मुख्य नियोजक वू वेनझोंग म्हणाले की, सर्वेक्षण, मॅपिंग आणि भौगोलिक माहिती देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी, जीवनाच्या सर्व स्तरांच्या गरजा पूर्ण कऱण्यास मदत करते. ते म्हणाले की नकाशे आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनास समर्थन आणि मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे आपले पर्यावरण आणि सभ्यता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं.

सचिन तेंडुलकरांना जाहिरात करायची तर भारतरत्न परत करा; बच्चू कडू आक्रमक 

चीनचा शेजारील देशांशी प्रादेशिक वाद
चीनची सीमा ज्या देशांना जोडून आहेत, त्यांचाशी चीनचे प्रादेशिक वाद आहेत. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) इतर सार्वभौम प्रदेशांवर प्रादेशिक नियंत्रणाचा दावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी फसव्या रणनीतीचा अवलंब केला आहे. अधिक भूभागावर नियंत्रण ठेवण्याच्या बीजिंगच्या विस्तारवादी प्रयत्नांनी सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. चीनने आता भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील काही भागांवर आपला दावा मांडला आहे आणि हे भाग तिबेटचा भाग असल्याचा युक्तिवाद केला आहे.

भारतीय ठिकाणांची नावे बदलण्यात आली
या वर्षी एप्रिलमध्ये चीनने पर्वत शिखरे, नद्या आणि निवासी क्षेत्रांसह 11 भारतीय ठिकाणांचे एकतर्फी नाव बदलले होते. बीजिंगने अशी रणनीती स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 आणि 2021 मध्ये, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने इतर भारतीय ठिकाणांचे नाव बदलले, ज्यामुळे आणखी एक राजकीय संघर्ष सुरू झाला. मात्र, आतापर्यंत भारत चीनच्या विस्तारवादी योजना नाकारत आला आहे.

दरम्यान, आता नव्या नकाशात भारताचा अरुणाचल प्रदेश दाखवल्यानं पुन्हा एकदा सीमेवर वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube