“मुर्खों के सरदार”! काँग्रेस अन् राहुल गांधींवर PM मोदींची प्रखर शब्दात थेट टीका

“मुर्खों के सरदार”! काँग्रेस अन् राहुल गांधींवर PM मोदींची प्रखर शब्दात थेट टीका

बैतूल : काल काँग्रेसचे एक मोठे तज्ञ सांगत होते की भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. अरे मुर्खों के सरदार, कोणत्या जगात राहता? आपल्या देशाचे कर्तृत्व न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी असा कोणता विदेशी चष्मा घातला आहे की ते भारतात पाहू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर प्रखर शब्दांत थेट टीका केली. (Prime Minister Narendra Modi directly criticized Congress leader Rahul Gandhi said murkho ke sardar)

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून 15 नोव्हेंबरला निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने शेवटच्या फेरीतील प्रचारासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे प्रमुख राष्ट्रीय नेते मैदानात आहेत, तर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभा होत आहेत.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काल काँग्रेसचे एक मोठे तज्ञ सांगत होते की भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. अरे मुर्खों के सरदार, हे कोणत्या जगात राहतात? आपल्या देशाचे कर्तृत्व न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी असा कोणता विदेशी चष्मा घातला आहे की ते भारतात पाहू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. पण आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे, असा दावा त्यांनी केला.

‘आता देशात दरवर्षी 3.5 लाख कोटी रुपयांचे मोबाईल बनतात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भारतात दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीचे मोबाईल बनवले जात होते. आज 3.5 लाख कोटींहून अधिक किमतीचे मोबाईल भारतात बनवले जातात. आज संपूर्ण देश व्होकल फॉर लोकल म्हणत आहे. सणांच्या निमित्ताने लोक भारतात बनवलेल्या वस्तू आणि भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करतात. पण काँग्रेसच्या एका नेत्याने स्थानिकांसाठी आवाज उठवायला सांगितले का?

काँग्रेस जिथे आली तिथे विनाशच आणला : पंतप्रधान मोदी

‘जशी 17 नोव्हेंबरची तारीख जवळ येत आहे, तशा काँग्रेस नेत्यांच्या चाली उघड होत आहेत. काँग्रेसने पराभव स्वीकारला असून सगळे नशिबावर सोडले असल्याचे चित्र आहे. मोदींच्या गॅरेंटीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने क्षणभरही टिकू शकत नाहीत, हे काँग्रेसने मान्य केले आहे. ही निवडणूक मध्य प्रदेशच्या विकासाला दुहेरी इंजिनचा वेग देणारी आहे. तरुण आणि महिलांना पुढे जाण्यासाठी नवीन संधी देणारी आहे. मध्य प्रदेशच्या तिजोरीवर काँग्रेसच्या लूट आणि भ्रष्टाचाराचे पंजे पुन्हा कधीही लागू नयेत. काँग्रेसला हिसकावून घ्यायचे, लुटायचे कसे कळते, हे लक्षात ठेवावे. काँग्रेस जिथे जिथे आली तिथे तिथे विनाशच आणला, असाही हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

यातीलच एका सभेत राहुल गांधी यांनी मेड इन चायनावरुन पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. “तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या पाठीमागे, तुमचा शर्ट, तुमचे शूज पहा – तुम्हाला तिथे ‘मेड इन चायना’ लिहिलेले दिसेल. भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. तुम्ही कॅमेरा आणि शर्टच्या मागे ‘मेड इन मध्य प्रदेश’ टॅग पाहिले आहेत का? आम्हाला हे टॅग आणायचे आहे” असाही विश्वास गांधींनी व्यक्त केला होता.

‘आमचे सरकार आल्यानंतर तरुण बेरोजगार राहू नयेत, त्यांनी कारखान्यांमध्ये काम करावे, अशी माझी इच्छा आहे. एके दिवशी, एका चिनी तरुणाने त्याचा फोन काढल्यावर, त्याच्या मागच्या बाजूला ‘मेड इन मध्य प्रदेश’ असे लिहिलेले असावे. तेव्हा तो म्हणावा, हे मध्य प्रदेश कुठे आहे? मला जाऊन बघायचे आहे. हे कोणते ठिकाण आहे ज्याने आमच्या सर्व नोकऱ्या घेतल्या आणि मेड इन चायनाला मेड इन मध्य प्रदेश बनवले? असेही राहुल गांधी म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज