नवे शिक्षणमंत्री म्हणजे एक वाईट विनोद; भाजपा नेत्याच्या लेकीची केंद्र सरकारवर खरमरीत टीका
उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने खरमरीत टीका केली.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात (NEET) झालेल्या आंदोलनांनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुमारे ३६ दिवस चाललेल्या या अभूतपूर्व विद्यार्थी आंदोलनाला मोठा विजय मिळाला असला, तरी आता राजकीय वर्तुळातून आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या घटकांमधूनच सरकारवर टीका होऊ लागली आहे.
उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने ‘जेन-झी’ च्या या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही, तर तिने नव्या शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर खरमरीत शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. एका मुलाखतीत यशस्विनीने आपली भूमिका स्पष्ट केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काही खूप मोठी ऐतिहासिक क्रांती मानणे ही अत्यंत संकुचित विचारसरणी ठरेल, असं सांगत तिने प्रधान यांच्या राजीनामा पत्रातील भाषेवरही जोरदार आक्षेप घेतला.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं होतं की, ‘विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ नये आणि देशविरोधी शक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नयेत म्हणून ते पद सोडत आहेत. यावर भाष्य करताना यशस्विनी म्हणाली, राजीनाम्याची भाषा पाहता, त्यात कोणतीही दिलगिरी किंवा पश्चात्ताप दिसत नाही. जबाबदारी स्वीकारण्याऐवजी स्वतःला हुतात्मा किंवा शहीद दाखवण्याचाच हा प्रयत्न वाटतो असा थेट घणाघात तीने केला आहे.