Maharashtra Politics : भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ होणार फेल? राष्ट्रवादीचे ‘हे’ 5 शिलेदार मैदानात

Maharashtra Politics : भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ होणार फेल? राष्ट्रवादीचे ‘हे’ 5 शिलेदार मैदानात

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणाचा हक्क असेल असा प्रश्न राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विचारला जात आहे. मात्र, पक्ष फुटल्यानंतर शरद पवार ज्या तडफेने उठले आहेत. राज्यात दौरे सुरू केले आहेत त्यावरून अजितदादांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. शरद पवार यांनी पक्षातील कथित ऑपरेशन लोटस फेल करण्यासाठी पाच योद्ध्यांना तैनात केले आहे. आता हे शिलेदार आपापल्या कामाला लागले आहेत.

दबावाच्या राजकारणात तसेही शरद पवार (Sharad Pawar) माहीर आहेत. त्यांच्याच रणनितीचा परिणाम आहे की मागील काही दिवसांत तीन आमदार पुन्हा त्यांच्याकडे परतले आहेत. आता रोहित पवार यांनीही आगामी पंधरा दिवसात आणखी आमदार परत येतील असा दावा केला आहे.

बावनकुळेजी, आधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या; ठाकरे गटाच्या नेत्यांनं दिलं आव्हान

अजित पवार यांनी राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर शरद पवार अॅक्शनमध्ये आले. त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत संघर्ष करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी लगेचच मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. जाणकारांच्या मते, राष्ट्रवादीला वाचविण्यासाठी पवारांसमोर दोन मोठी आव्हाने आहेत. आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ मजबूत करणे आणि दुसरे म्हणजे जे आपल्याबरोबर आहेत त्यांना टिकवून ठेवणे.

काय आहे शरद पवारांची रणनिती?

2019 प्रमाणेच बाकी नेत्यांना आपल्याकडे वळवून अजित पवार यांना एकटे पाडणे ज्यामुळे अजित पवार पुन्हा मार्गावर येतील. तसेच संख्याबळ मजबूत करणे ज्यामुळे अजित पवार यांनी जरी पक्षावर दावा सांगितला तरी त्यात काही अर्थ राहणार नाही.

कोण आहेत पवारांचे शिलेदार

जयंत पाटील

जयंत पाटील शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अजित पवार गटाचीही त्यांच्यावर सर्वाधिक नाराजी आहे. पाटील सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदा जयंत पाटील यांना हटविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले होते.

जयंत पाटील संकटाच्या काळात परिस्थिती हाताळण्यात तरबेज आहेत. 2019 मध्ये जेव्हा अजित पवार यांनी बंडखोरी केली होती त्यावेळी आमदार फुटू न देण्याची जबाबदारी पाटील यांच्याच खांद्यावर होती. आताही पाटील प्रत्येक जिल्हाध्यक्षाच्या संपर्कात आहेत. बहुमत आपल्या बाजूने करण्याची कसरत करत आहेत. अजित पवारांच्या गटात जाणाऱ्या नेत्यांवर कारवाईही करत आहेत. शरद पवार यांच्या समर्थनार्थ हमीपत्रही तयार करून घेत आहेत.

1999 ते 2004 या काळात पाटील मंत्री राहिले. त्यांनी अर्थ, गृह आणि नियोजन यांसारखी खाती सांभाळली आहेत. 2018 मध्ये शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्या जागी पाटील यांना प्रदेशाध्यक्ष केले. 2019 मध्ये पक्षाची कामगिरी चांगली राहिली तर त्यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनवले गेले.

12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; पंकजा मुंडे, रामदास कदम, हर्षवर्धन पाटलांचा वनवास संपणार?

जितेंद्र आव्हाड

भाजपाच्या ऑपरेशन लोटसला फेल करण्यात जितेंद्र आव्हाडही आघाडीवर आहेत. त्यांनाच विरोधी पक्षनेते नियुक्त करण्यात आले आहे. आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच आव्हाड यांना 1996 मध्ये महाराष्ट्र काँग्रेस युवा आघाडीचा अध्यक्ष बनवले गेले होते. 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये आव्हाड चिकित्सा शिक्षा मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही ते मंत्री होते.

रोहित पवार

शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित पवारही भाजपाच्या ऑपरेशन लोटसला फेल करण्याच्या कामगिरीत गुंतले आहेत. ते सध्या सोशळ मीडिया आणि शरद पवार यांच्या दौऱ्यांचे नियोजन करत आहेत. पवार यांच्या सभांतून होणारी गर्दी पाहता तीन आमदार पुन्हा स्वगृही परतले आहेत.

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांनी काय काय दिले याची प्रोफाइल तयार केली होती. यावर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत.

अमोल कोल्हे

अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी देखील जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. 2014 मध्ये ते शिवसेनेत आले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केले होते. त्यांची लोकप्रियता लक्षात आल्याने नंतर त्यांना उपनेता करण्यात आले. 2019 मध्ये मात्र कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

15 दिवसांत ‘ते’ लोकं साहेबांकडे फिरणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान…

अजितदादांनी बंड केले त्यावेळी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात कोल्हे सुद्धा हजर होते. नंतर मात्र ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले. आता कोल्हे फिल्डवर काम करत आहेत. अजित पवार यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. छोटे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

कोल्हे यांच्या माध्यमातून युवक आणि कार्यकर्त्याना जोडण्याची शरद पवार यांची रणनिती आहे. ज्यामुळे अजित पवारांचा गट कमकुवत होईल. याव्यतिरिक्त कोल्हे मीडियामध्येही पक्षाची बाजू जोरदारपणे मांडत आहेत.

सुप्रिया सुळे

भारतीय जनता पार्टीच्या या राजकारणाला ब्रेक लावण्याची मोठी जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली गेली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे मुख्य कारण सुळे यांचे पक्षातील वाढते महत्व मानले जात आहे. पक्षात सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

आता सुळे या शरद पवार गटातील सर्व नेत्यांत समन्वय साधण्याचे काम करत आहेत. त्यांची रणनिती यशस्वी करण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडेच आहे. जिल्हा पातळीवरील नेत्यांच्याही त्या भेटी घेत आहेत. या संघर्षाला शरद पवार विरुद्ध अजित पवार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा या लढाईशी काहीच संबंध नाहीत. पवार साहेब अजूनही आमचे दैवत असल्याचे अजित पवार गटातील नेते म्हणत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी 2006 मध्ये राजकारणात पदार्पण केले. त्यावेळी त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. 2009 मध्ये बारामती मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली. या निवडणुकीत त्या विजयी ठरल्या. त्यानंतर 2014 आणि 2019 निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला. 2023 मध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube