आज पुण्यात दुसरा टी 20 सामना, मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा इरादा

आज पुण्यात दुसरा टी 20 सामना, मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा इरादा

पुणे : वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासह तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 नं आघाडी घेतलीय. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे.

पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती समोर आली नाही. पण संजू सॅमसन फिट नसल्यास भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकला होता. तो तंदुरुस्त झाल्यास संघात पुनरागमन करेल, अशात हर्षल पटेल याला वगळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पुण्याच्या मैदानावर सामना होत असल्यामुळं लोकलबॉय ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार का? याकडं पुणेकरांचं लक्ष लागलंय.

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला. शिवम मावीने चार विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये पाच बाद 162 धावा केल्या. दीपक हुडाने 23 चेंडूंमध्ये नाबाद 41 तर अक्षर पटेलने 20 चेंडूंमध्ये नाबाद 31 धावांची खेळी केली. श्रीलंकेला 20 षटकांमध्ये 160 धावांची मजल मारता आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube