मराठी भाषा वादावर नितीन गडकरींचे मौनभंग; शेखर सुमन यांना म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात!”
Shekhar Tonight : चौदा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शेखर सुमन ‘शेखर टुनाईट’सह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यावेळी ते
Shekhar Tonight : चौदा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शेखर सुमन ‘शेखर टुनाईट’सह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यावेळी ते यूट्यूबवरून प्रेक्षकांसमोर येत असून, त्यांच्या खास शैलीतील मनापासूनचे संवाद, धारदार विनोद आणि प्रभावी दृष्टिकोन सादर करत आहेत. या नव्या आणि उत्साहपूर्ण पर्वाची सुरुवात करताना, पहिल्या भागात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले आहे.
या सखोल आणि विचारप्रवर्तक संवादात गडकरी यांनी भाषा, राजकारण, सार्वजनिक जबाबदारी आणि ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेचे महत्त्व यावर मनमोकळेपणाने भाष्य केले. महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की राज्याबाहेर राहिल्यावर त्यांना मराठी संस्कृती आणि ओळखीचे खरे महत्त्व जाणवले.
याबद्दल बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, “आपल्याला मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी गाणी आणि अरुण तसेच श्रीधर फडके यांसारख्या कवींचा अभिमान आहे. मी महाराष्ट्राबाहेर अधिक वेळ घालवू लागलो, तेव्हा मला मराठीचे खरे महत्त्व समजले. विविधतेत एकता ही आपली खासियत आहे आणि ती अतिशय सुंदर गोष्ट आहे.”
संवादादरम्यान शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी अलीकडील मराठी भाषेवरील वादाचा उल्लेख करत म्हणाले, “मराठीबद्दल बोलायचे झाले तर अलीकडे असा आदेश देण्यात आला होता की ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना स्कूटर किंवा रिक्षा चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्या बिचाऱ्या लोकांना भीती वाटू लागली आणि आमच्यासारखे बिहारी लोक तर आणखीच चिंतेत पडले, सर. कृपया आमच्या बिहाऱ्यांची काळजी घ्या.”
यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बिहार राज्य झाल्यानंतर आम्ही गंगेवर सर्वाधिक पूल आणि रस्ते बांधले आणि बिहारचे संपूर्ण चित्र बदलून टाकले. जर आम्ही बिहाऱ्यांच्या विरोधात असतो, तर हे सगळं कसं केलं असतं? पण नंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला. आम्ही असेही म्हटले की दुसरे कोणतेही काम उरले नाही आणि मला रिक्षा चालवावी लागली, तर मीही मराठी शिकेन. कारण भाषा येत नसेल, तर काम गमवावे लागू शकते. प्रत्येक भाषेला तिच्या साहित्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असावा, पण तो अभिमान कधीही अतिरेकी किंवा हटवादी होऊ नये.”
ते पुढे म्हणाले, “राजकारण म्हणजे केवळ सत्तेचे राजकारण नाही. ते तडजोडी, बंधने, मर्यादा आणि विरोधाभास यांचा खेळ आहे. दुर्दैवाने, अनेक वेळा लोकांना जे त्रासदायक वाटते किंवा राग आणते, त्यासाठी राजकीय पक्ष किंवा नेत्यांपेक्षा जनतेचीच अधिक जबाबदारी असते. ज्या दिवशी जनता ठरवेल की काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे उदाहरणार्थ, चुकीचे राजकारण करणाऱ्यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी बदल सुरू होईल. लोकांनी ठामपणे पुढे आले, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलू शकते.”
आपल्या तत्त्वांबद्दल आणि सार्वजनिक जीवनातील दृष्टिकोनाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, “मी तीन वेळा संसदेत निवडून आलो आहे आणि एका टप्प्यानंतर माझ्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतला. एक काळ असा होता की महाराष्ट्रात जातीय चळवळी खूप सक्रिय होत्या, आणि त्या वेळी मी सार्वजनिकपणे म्हटले होते, ‘जो कोणी जातीय राजकारण करेल, त्याला मी कठोर विरोध करेन.’ मला त्याचा काही फरक पडला नाही, कारण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती त्यांनी मला मत दिले असो वा नसो माझीच आहे आणि मी सर्वांसाठी समान काम करेन. माझा संपूर्ण मतदारसंघ हेच माझे कुटुंब आहे. जात, धर्म, श्रद्धा, भाषा किंवा लिंग यांच्या आधारावर मी कधीही भेदभाव करणार नाही.”
पुण्यात टोळीयुद्ध संपेना! वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या…
अध्ययन सुमन यांनी निर्मिती केलेला आणि धर्मेश सांगाणी निर्मित हा शो, शेखर सुमन यांची खास विनोद, प्रामाणिकपणा आणि भावनिकतेची शैली पुन्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो जी प्रेक्षकांना दशकभरापासून मिस होत होती. प्रभावी पाहुणे, मनाला भिडणारे क्षण आणि शेखर सुमन त्यांच्या खास अंदाजात ‘शेखर टुनाईट’ हा केवळ पुनरागमन नाही, तर एक वेगळा अनुभव ठरणार आहे. दर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता, यूट्यूबवर ‘शेखर टुनाईट’पाहायला विसरू नका.