मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेच्या सेटवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी दिली खास भेट
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी मालिकेच्या सेटवर येत कलाकारांशी संवाद साधला आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
special gift on the sets of Mi Savitribai Jotirao Phule : मी सावित्रीबाई जोतीराव फुले या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळत असून सावित्री-जोतींच्या विचारांची ज्योत घराघरांत पोहोचत आहे. समाजप्रबोधनाचा दीप तेवत ठेवणाऱ्या या मालिकेच्या सेटवर नुकतीच एक विशेष आणि हृदयस्पर्शी भेट घडली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी मालिकेच्या सेटवर येत कलाकारांशी संवाद साधला आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
या प्रसंगी मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. महिलांनी सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनाची कथा पडद्यावर जिवंत करणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले. त्यांच्या मते, मालिकेतून दाखवला जाणारा स्त्रीशक्तीचा संदेश आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करणारे ठरले आहे.
भेटीदरम्यान महिलांनी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितले. अनेकांनी पतीच्या निधनानंतर उभ्या राहिलेल्या संघर्षांची कहाणी मांडली. त्या वेदनादायी अनुभवांमध्येही सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा कशी आधार देत आहे, हे त्यांनी सांगितले. मालिकेतील संवाद आणि प्रसंग त्यांना आत्मविश्वास देतात, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. अमोल कोल्हे यांनी या भेटीबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे कार्य केवळ इतिहास नाही, तर आजही मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार भांडणात आमदार बापू पठारे यांचा विषय निघाला
या महिलांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि जिद्द आम्हाला आणखी जबाबदारीची जाणीव करून देतो. त्यांनी पुढे सांगितले की, मालिकेचा उद्देश केवळ मनोरंजन नसून समाजमन जागृत करणे हा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ‘रसिकाश्रय’ संस्था गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे.
त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या महिलांसाठी मालिकेच्या सेटवर खास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीत महिलांना शूटिंगची प्रक्रिया पाहण्याची संधी मिळाली, तसेच कलाकारांशी थेट संवाद साधता आला. सेटवरील वातावरण त्या दिवशी विशेष भावनिक झाले होते. महिलांनी कलाकारांना शुभेच्छा देत मालिकेने समाजात सकारात्मक बदल घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काही महिलांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित गाणीही सादर केली. संपूर्ण टीमने त्यांचे मनापासून स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही भेट केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर संघर्ष आणि प्रेरणा यांचा संगम ठरला. एका बाजूला पडद्यावर सावित्रीबाईंची लढाई दाखवली जात होती, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आयुष्यात संघर्ष करणाऱ्या महिलांची जिद्द अनुभवता येत होती. या अनोख्या भेटीने मालिकेच्या टीमला नवसंजीवनी दिली असून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.
