Download App

न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा, चक्रीवादळामुळे झाले मोठे नुकसान

  • Written By: Last Updated:

विलिंगटन : न्यूझीलंडमध्ये आलेल्या गेब्रिएल चक्रीवादळामुळे (Cyclone Gabrielle) मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. देशात मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो घरांमध्ये वीज नाही. दरम्यान, न्यूझीलंडमधील भीषण विध्वंस पाहता, न्यूझीलंडला तिसऱ्यांदा देशात राष्ट्रीय आणीबाणी (National emergency) जाहीर करावी लागली आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स (New Zealand Prime Minister Chris Hipkins) यांनी आणीबाणीची घोषण केली. हिपकिन्स आणीबाणीची घोषणा करतांना म्हणाले, “देशभरातील देशवासीयांसाठी ही एक मोठी रात्र होती. विशेषतः उत्तरेकडील वरच्या भागांसाठी. चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून देशभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.”

न्यूझीलंडने यापूर्वी 2011 च्या भूकंपानंतर आणि 2020 मध्ये कोविड महामारीचा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती.

न्यूझीलंडच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी न्यूझीलंडमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यामुळे जवळपास 509 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. काल स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता, देशाच्या उत्तर भागात 250KM वेगाने वारे वाहले. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला. ऑकलंडमध्ये गेल्या 24 तासात 4 इंच पाऊस झाला आहे. परिणामी, समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. ऑकलंड शहरात सध्या वाऱ्याचा वेग ताशी 110 KM आहे. उत्तर भागातील सुमारे 46 हजार घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

चक्रीवादळामुळे लोकांना घरे खाली करून छतावर आसरा घ्यावा लागत आहे. अंदाजानुसार सुमारे 2 लाख 25 हजार लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे

हवामान खराब होऊ शकते

आपत्ती व्यवस्थापन मंत्री कॅरेन मॅकअनल्टी म्हणाले की, न्यूझीलंड सध्या सर्वात भीषण चक्रीवादळाचा सामना करत आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून आणखी पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात प्रचंड पूर, भूस्खलन आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशभरातील वीज कंपन्या, सबस्टेशन्स आणि पॉवर नेटवर्कचे नुकसान बरेच नुकसान झाल्याची त्यांनी सांगिलते. पुढील 24 तास महत्त्वाचे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता आहे.

Ashok Chavhan : पुणे महापालिकेचे ऑडिट भाजप का टाळतेय?

मदत कार्य चालू

ऊर्जा मंत्री मेगन वूड्स यांनी सांगितले की, सुमारे 2 लाख 25 हजार लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्यांनी किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढले आहे. नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे आणखी लोक घरे सोडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मोबाईल सेवा विस्कळीत झाली असून काही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
टंचाईच्या भीतीने अतिसंकटग्रस्त भागातील लोकांना अन्नाचा जपून वापर करण्यास सांगण्यातत आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर आणि बोटींच्या सहाय्याने लोकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान हिपकिन्स यांनी दिली. दरम्यान, किती लोक विस्थापित झाले आहेत, हे सांगणे कठीण असून आतापर्यंत कोणाच्याही मृत्यूची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितले.

 

Tags

follow us