‘गायरान जमीन वाटप प्रकरणी सखोल चौकशी होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा घ्या’

‘गायरान जमीन वाटप प्रकरणी सखोल चौकशी होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा घ्या’

नागपूर : तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीनं वाटप केलं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे.

तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याचं उघड झालंय. सातत्यानं या घटना घडताहेत. ज्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात, त्यावेळी या घटना घडणं योग्य नाही असंही अजित पवार म्हणाले.

गायरान जमीनीबाबत वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण या जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी 17 मे 2018 रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नाही, असा चुकीचा अभिप्राय दिला गेला आहे.

एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरुन नाही. नियमबाह्य जमीनीचे वाटप झाले आहे. कदाचित आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असाही थेट आरोप अजित पवार यांनी केलाय.

अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत असून या सर्व प्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

या जमिन प्रकरणी वेगवेगळ्या ऑर्डर निघाल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करुन चौकशी होईपर्यंत सबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube