बीड जिल्ह्यासाठी अपघाती सत्र! मुंडे, मेटे आणि आता आर. टी देशमुख…संशयाचं मळभ मात्र कायम…

Munde, Mete, R T Deshmukh Accident : सगळं काही रोजच्यासारखं सराईतपणे चालू असताना अशीच बातमी आली की बीडचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झालाय. त्यानंतर काहीच वेळात बातमी आली की गोपीनाथ मुंडे यांचं निधन. (Accident) अनेक वर्ष संघर्षाची वाट धरलेले आणि मोठा प्रवास केलेले गोपीनाथ मुंडे अशा अपघाती निधनात गेले याची हळहळ ही अनेकांसाठी चटका लावणारी बातमी होती. त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट होती ती नुकतीच त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्याने ते असे कसे गेले याची.
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला एक राजकीय उभारी देणारी बातमी ही त्यांच्या मंत्रिपदाची होती. मात्र, त्यानंतर थेट मृत्यूची बातमी आल्याने सगळ्यांचा अस्वस्थ करणारा धक्का बसला होता. त्यातही अपघात झाला त्याची फक्त बातमी आली. ना कुठला व्हिडिओ आला ना कुठला फोटो. त्यामुळं केंद्रीय मंत्र्याचा असा कसा अपघात झाला अशी शंका येऊन अनेकांनी याची अपघात की घातपात अशी चर्चा केली. आजही जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांचा खरच अपघाती मृत्यू झाला की काही घात झाला अशी शंका येते आणि घातच झाला असेल असच जास्त गडदपणे वाटत असं अनेक लोक बोलतात. मात्र, तशी कुठलीच शंका घेऊन त्यांच्या कुटुंबातील किंवा इतरांनी काही ठोस मागणी न केल्याने तो विषय मागचं पडला…
भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
पुन्हा तेच घडलं. मध्यरात्रीच मुंबई महामार्गावर अपघात झाला आणि त्यामध्ये बीडचे नेते विनायक मेटे गेल्याची बातमी आली. या माणसानेही संघर्षाची मोठी वाट पार केली होती. त्यांना जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी काही विधायक करता येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच ते अपघाती गेले. त्यांच्याबद्दलही मनात अनेकदा शंकाच आली. खरच गेले की काही घातपातच झाला? कारण त्यावेळीही शंका घ्यायला अनेक वाव होता. मेटे यांचा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणाचा पत्ता चालक लवकर देत नव्हता. त्याने किमान आडीच ते तीन तास पत्ता सांगायला उशिर केला. हा उशिर का केला? त्यातही अपघातात चालक एकदम सुखरूप.
मेटे यांनाही डोक्याच्या मगच्या बाजूला कापल्यासारखंच लागलं अन् हाताला थोड. बाकी कुठं काही नाही मग शंका का येणार नाही? त्याचवेळी अनेक राजकीय लोक तेथे आले अन् त्यांनी मीडियावर लगेच हा दुर्दैवी अपघात आहे, ते मोठे नेते होते असं बोलून सगळेच मोकळे व्हायला लागले. मात्र, मेटे यांच्या सामान्य कार्यकर्त्याला शंका आली तो तशा पद्धतीने बोलू लागला. त्यामुळे हे सगळ घडल्यानंतर त्याची पुढे सखोल चौकशी होईल असं वाटलं असताना तस काही घडलं नाही. त्यांच्या पत्नी नोकरी सोडून राजकारणात आल्या. मग चौकशीची कुणी मागणी करायची हाच प्रश्न निर्माण झाला. कारण, कुटुंबातल्या माणसाने विषय लावून धरला तर लोक सोबत उभा राहिले असते. पण, त्यांनीच पुढचा रास्ता धरल्यावर लोक कुठल्या रस्त्याने जाणार? त्यामुळे त्यांचाही विषय असाच मागे पडला…
काल अशीच दुःखद आणि दुर्दैवी बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, भाजपचे माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख उर्फ जिजा यांचे लातूरला जात असताना अपघाती निधन झाले. आर. टी. यांच्या निधनाची बातमी मोठी दुःखदायक आहे. मात्र, हा अपघातच आहे. याचे फोटो व्हिडीओ समोर आलेत आणि गाडी स्लिप झाल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, जिजा नावाने ओळखले जाणारे आर. टी. संयम ठेऊन आणि धोरणीपणाने पुढे जाणारे नेते होते.
गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांनी ज्या वकुबाने काम केलं त्याच वकुबाने ते आजही राजकारणात वावरत होते. गोपीनथ मुंडे यांचा हुकमी एक्का म्हणता येईल अशा फळीतले आर.टी देशमुख होते. मधल्या काळात तब्येतीच्या काही तक्रारी आल्याने ते थोडे राजकीय पटलावरून बाहेर असल्यासारखं झालं होत. मात्र, आता ते पुन्हा सक्रिय पातळीवर आले होते. परंतु, नियतीने घाला घातलाच आणि त्यांना कवेत घेतलं. माजलगाव आणि बीड जिल्ह्यासाठी मोठी तळमळ असलेला नेता अपघाती निधनाने गेला हे दुःखदायक आणि वेदनादायी आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील हे मातब्बर नेते अपघाताने गेल्याने जिल्ह्याचं जे नुकसान झालं ते अधिक दुःखदायक आहे. त्यातही मुंडे आणि मेटे यांच्या अपघाती निधनाचं आजही गूढ कायम आहे…